मुंबई: “आजचे बोलघेवडे पुरोगामी विचारवंत छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मीठासारखा वापर करतात. आपल्या सोयीच्या स्वादानुसार ते या महामानवांचा संदर्भ घेतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा उपेक्षित आणि वंचितांसाठी काम करतो. त्यामुळे आज जर शाहू, फुले आणि आंबेडकर हयात असते, तर त्यांनीही संघाचे समर्थनच केले असते,” असे परखड मत ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र भाजपाचे प्रदेश प्रवक्ते आणि लेखक अवधूत वाघ यांनी लिहिलेल्या ‘जयोस्तुते’ या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शंभर वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेणाऱ्या बहुप्रतिक्षित पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते.
या प्रसंगी लेखक अवधूत वाघ यांनी समरसतेवर भर देताना सांगितले की, “दोन गोष्टी असमान असू शकतात; मात्र त्यामध्ये उच्च-नीच असा भेद नसावा. तसाच माणसा-माणसातही उच्च-नीचतेचा भाव असू नये.”
या कार्यक्रमात आमदार संजय उपाध्याय यांनी आपल्या आक्रमक भाषणात, “आजचा हिंदू हा एका गालावर मारले तर दुसरा गाल पुढे करणारा नाही; तर जो मारेल त्याचे हात-पाय तोडणारा आहे,” असे ठामपणे सांगितले.
मुंबईतील पु. ल. देशपांडे कला अकादमी येथे नुकत्याच पार पडलेल्या या भव्य आणि दिमाखदार प्रकाशन समारंभात ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ सुनील कर्वे, मुंबई चौफेरचे संपादक प्रफुल्ल फडके, लोकसत्ताचे संदीप आचार्य, पुढारीच्या मृणालिनी नानिवडेकर, तरुण भारतचे किरण शेलार, मॅक्स महाराष्ट्रचे रवींद्र आंबेकर, जय महाराष्ट्रचे प्रसाद काथे, ज्येष्ठ पत्रकार स्वप्नील सावरकर तसेच ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत जतिन देसाई यांनीही आपले विचार मांडले.
या समारंभात लेखक अवधूत वाघ यांनी वनवासी कल्याण आश्रमाला ९ लाख ५० हजार रुपये, तर दृष्टिहीन बांधवांसाठी कार्यरत नेत्रदीप प्रतिष्ठानला ३ लाख ६५ हजार रुपयांची देणगी देत समाजाप्रती असलेली आपली कृतज्ञता व्यक्त केली.
अतिशय दिमाखदार स्वरूपात पार पडलेल्या या कार्यक्रमास महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, माजी मंत्री भाई गिरकर, माजी आमदार अतुल शहा, नगरसेवक नवनाथ बन, प्रकाश गंगाधरे, मंगेश पवार, श्वेता परुळेकर, किशोर मोघे, गणेश हाके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

