Twitter : @Rav2Sachin
मुंबई
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (Mahapatrinirvan Day) आज चैत्यभूमीवर निळा महासागर उसळला. यंदाही महामानवाला अभिवादन करण्यासाठी आंबेडकरी अनुयायांच्या संख्येत जराही कमरता दिसून आलेली नाही. सुमारे २५ लाखांच्या आसपास आंबेडकरी अनुयायांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
महापरिनिर्वाण दिनानमित्त चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना (Dr Babasaheb Ambedkar) अभिवादन करण्यासाठी मागील पाच दिवसांपासून आंबेडकरी अनुयांयी शिवाजी पार्क येथे येऊ लागले होते. मुंबई महापालिकेच्यावतीने (BMC) शिवाजी पार्क मैदानात मोठे मंडप उभारण्यात आले होते. या मोठ-मोठ्या मंडपात अनुयायी यांची राहण्याची सोय करण्यात आलेली होती. तसेच महापालिकेच्यावतीने अनुयायांना मोफत बिस्कीट आणि पाणी वाटपासोबत पुलावचे वाटप करण्यात आले होते. पालिकेच्यावतीने दोन दिवस २ लाख पाण्याच्या बाटल्यांचे वाटप सोबत २ लाख बिस्किटांचे पुडे आणि १ लाख जणांना पुलाव वाटप करण्यात आले.

तसेच यावेळी पालिकेच्या जी नॉर्थ विभागातर्फे पहिल्यांदा शौचालयात दुर्गंधी पसरू नये, याकरिता हायड्रोजन पॅरोक्साइड स्प्रेचा वापर करण्यात आला. पालिकेतर्फे २९७ शौचालय तर २५९ स्नानगृह उभारण्यात आले होते. यासोबत पालिकेतर्फे ४४८ स्टॉल्स उभारण्यात आले होते. यामध्ये विविध कंपन्या आणि संस्थांचे स्टॉल्स होते. अन्न वाटपांचे ९५ स्टॉल्स, पाणी वाटपाचे २६ स्टॉल्स आणि पुस्तकांसोबत फोटो व अन्य स्टॉल्स उभारण्यात आले होते.
यंदा लोकांमध्ये पुस्तक खरेदी (purchase of books) करण्याकडे जास्त ओढा दिसून आला. सुशिक्षित अनुयायी यांचा विद्रोही पुस्तक खरेदीकडे कल होता, तर अशिक्षित अनुयायी बाबसाहेबांचे पुस्तक घेताना दिसून आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्वाक्षरी असलेल्या टी शर्ट ची विक्री जोरदार होती.
यंदा पुस्तक खरेदीत भारताचे संविधान (Constitution of India) आणि बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकाकडे आंबेडकरी अनुयांयाचा ओढा जास्त होता, असे पुस्तक विक्रेत्यांनी सांगितले. कोरानानंतर पुस्तक खरेदीला लोकांचा जास्त प्रतिसाद दिसला. सर्वात महत्वाचे म्हणजे, ऑनलाईन पुस्तक वाचण्याची संधी लोकांना उपलब्ध झाली असली तरी पुस्तक खरेदी करुन वाचण्याकडे लोकांचा जास्त कल आहे, हे चैत्यभूमीवरील पुस्तक विक्रीतून दिसून आल्याचे मत पुस्तक विक्रेत्यांनी व्यक्त केले.

विविध बड्या बड्या कंपन्यातर्फे अन्न वाटपाचे स्टॉल्स शिवाजी पार्क येथे उभारण्यात आलेले होते. यामध्ये महापालिकेच्या अनुज्ञापन विभागातील प्रत्येक कर्मचारी आणि अधिकारी यांच्या स्ववर्गणीतून अनुयायांसाठी मोफत भोजन वाटपाचा मोठा स्टॉल्स उभारण्यात आला, असे विजय अडसूळ यांनी सांगितले. दोन दिवसांत २० हजार अनुयायांना मोफत भोजन वाटप करण्यात आल्याचे अनिल काटे यांनी सांगितले.
कोणी दिल्ली तर कोणी उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश तर कोणी गडचिरोली अशा प्रकारे देशाच्या कानाकोपऱ्यातून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आंबेडकरी अनुयायांचा निळा महासागर चैत्यभूमीवर उसळला होता. मध्यरात्री १२ वाजल्यापासून चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी अनुयायांना सोडण्यास सुरुवात झाली. सायंकाळपर्यंत वरळी येथील सासमिरा रोडपर्यंत आंबेडकरी अनुयायांची रांग अभिवादन करण्यासाठी लागली होती. अभिवादन करण्यासाठी तीन ते चार तास रांगेत उभे रहावे लागत होते.