लेख

द मास्क

By ऋचा सुनील पारेख, नवी मुंबई.

आयुष्याच्या रंगमचावर घातले
सगळ्यांनी मुखवटे हजार आहेत
कधी बनावटी दिखाव्यात तर
कधी गहिरे घाव लपवण्यात..
कधी भावनांच्या कलाकुसरीत
तर कधी रक्ताच्या नात्यात.,

‘मुखवटा ‘ हा शब्द जणू मानवाच्या अस्तित्वाबरोबरच जोडला गेलाय. त्याला आपण वेगळं पाडूच शकत नाही. जन्मानंतर बोलायला लागल्यापासूनच या मुखवट्याचे पापुद्रे चेहऱ्यावर चढायला सुरवात होते. काहीवेळा स्वभावत:च, काहीवेळा संस्कारांनी, काहीवेळा जगरहाटीनुसार त्याची रूपं बदलत जातात, पण मुखवटा मात्र प्रत्येक व्यक्तीने धारण केलेलाच असतो. कोणीही त्याला अपवाद नाही.

द मास्क कितीतरी व्यक्तित्व घडवली ह्याने आणि मोडकळीसपण आणली. व्यक्तित्व हे आपल्याला समाजाने बहाल केलेलं असतं. प्रत्येक माणूस त्या व्यक्तित्वाच्या मास्कसह जगत असतो. त्याची निजता त्यात कुठे? कशी? कधी हरवून बसते हे त्याचं त्यालाही उमगत नाही. निजता, प्रामाणिकता, स्वाभाविकता ही प्रकृतिकडून आलेली असते, मूळत:च असते. अगदी जन्माला आलेल्या बाळाप्रमाणे! कालांतराने घरातून, समाजातून त्यावर मुखवटे चढवले जातात आणि एक विशिष्ट व्यक्तित्व तयार केलं जातं. ज्याप्रमाणे –
“तू मुलगा आहेस. अजिबात रडायचं नाही.”
“तू मुलगी आहेस. नीट वाग. मुलांसारखं राहणं तुला शोभत नाही. सातच्या आत घरात येत जा.”
हे झालं प्राथमिक स्तरावर. असे अनेक पापुद्रे असतात. या व्यक्तित्वाला सांभाळत असतांना सुरवातीपासून चढवलेल्या मुखवट्यातून एक कोरा करकरीत, समाजापुढे आदर्श असा मुखवटा माणूस धारण करतो, आणि त्या त्या परिस्थितीनुसार त्याचा प्रयोग करतो. म्हणूनच अनेकदा आपल्याला त्याचे बरेवाईट अनुभव येतात. त्याचं कारण असं की त्यावेळी माणूस त्या मुखवट्यातून काही काळ बाहेर पडतो. अशावेळी समाजाला धक्का बसतो की, ही व्यक्ती अशी असेल वाटलंच नव्हतं! पण हा बदल सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही असू शकतो. अनेकदा वाईट दिसणारी, वागणारी माणसं खऱ्या अर्थाने मायाळू आणि उदारपण असतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे डाकू मानसिंग. जितकी लूटमार तो डाकूच्या मुखवट्याने करत होता, तितकीच मदत तो खऱ्या चेहऱ्याने गरिबांना करत होता.

खरं म्हणजे व्यक्तित्व शब्द ग्रीकमधून आला आहे. प्राचीन ग्रीक नाटकाची ही विशेषता असायची की अभिनेता मुखवटा घालून नाटकात काम करायचे. लोकांना अभिनेता कोण आहे हे माहीत नसायचे. ते तो मुखवटा बघत आणि त्या मुखवट्याच्या माध्यमातून अभिनेत्याचा आवाज ऐकत. त्याला ग्रीक मध्ये व्यक्तित्व म्हणजेच परसोना असं म्हणतात. ‘सोना’ म्हणजे ध्वनी. परंतु काळानुसार तो अर्थ लुप्त होत गेला आणि :व्यक्तित्व’ म्हणजे पर्सनॅलिटी असा होत गेला.

आपलं व्यक्तित्व हे दुसरे घडवत जातात. लहानपणापासून जिथे खोटं बोलू नको,वाईट वागायचं नाही, वगैरे पासून सुरुवात झालेली असते तिथे अचानक कोणाचा फोन आला तर लगेच तीच व्यक्ती हेदेखील सांगते..
“त्यांना सांग बाबा घरात नाही म्हणून.”

म्हणजेच मुखवट्याच्या दुनियेत पदार्पण! याचं कारण असं आहे की समाजाला प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवायला आवडत असतं आणि प्रामाणिकतेवर, सत्यावर, साहजिकतेवर नियंत्रण ठेवणं अवघड असतं. ती अतिशय सहज प्रक्रिया असते. जी गोष्ट आपण लपवण्याच्या मागे असतो ती गोष्ट लहान मुलं पटकन बोलून टाकतात, कारण या त्यांच्या प्रक्रियेवर बंधन नसतं. जवळजवळ सगळी मानवता शिकार झाली आहे ‘मास्क’ जगाची, दिखाव्याची, नैसर्गिक नं होण्याची.

मुखवट्याला स्वतःचं असं अस्तित्व नसतं. तो एकतर दुसऱ्याच्या बुद्धीनेतरी चालतो किंवा मनाने. क्रिया तर शरीर करत असतं. परंतु त्याचं संचालन मानसिक चेतनेच्या माध्यमातून होत असतं. मुखवटा तयार होतो खोटं चिंतन, भय, उद्विग्नता, घृणा, आणि आवेशातून. मुखवटा कसा आणि कुठे वापरायचा हे मन सांगतं आणि दुसऱ्याची बुद्धी.

फार पूर्वी आजच्याइतका उपभोक्तावाद नव्हता. आज आपण प्रसन्नतेचे मुखवटेदेखील घालून मिरवतो. आपण जरा बारकाईने निरीक्षण केलं तर दिसेल की कुठल्याही देवी -देवतांचे किंवा महापुरुषांचे फोटो किंवा अगदी आपल्या आजीआजोबांचे फोटो हे आजच्या भाषेत सांगायचे झाले तर बत्तीशी दाखवून काढलेले आढळणार नाहीत. त्यांच्या मूर्ती किंवा फोटो हे ध्यानस्थ भासतात सुखस्थ नाही कारण त्यावेळी भावनांचे प्रदर्शन नव्हते. याउलट आजचे डीपी, फेसबुकवरचे व्हिडीओ, सेल्फी, फोटो, फक्त प्रसन्नतेचा धोधमार असतो. वास्तव त्यातलं मुखवट्याच्या आत लपलेलं असतं. आपल्याला सुखी होण्यापेक्षा सुखी आहोत हे दाखवणं जास्त गरजेचं वाटतं. हे सगळे फसवे मुखवटे. मुखवटा घालून माणूस केवळ इतरांना नव्हे तर स्वतःलाही फसवत असतो. ज्याला आपण प्रसन्नता म्हणतो त्यातही एक तणाव असतो. प्रसन्नता आणि सहजता यात फरक असतो. प्रसन्नता एक उत्तेजना आहे. पण सहजता नैसर्गिक आहे.

एक उघड सत्य हे पण आहे की माणूस मुखवटा धारण नं करता जगूही शकत नाही. विचार करून बघा माणूस आहे तसाच वागला तर त्याचे काय परिणाम भोगावे लागतात.

दोन प्रकारचे मुखवटे असतात. सकारात्मक आणि नकारात्मक. सकारात्मक मुखवटे हे स्वतःच्या आणि इतरांच्या भल्यासाठी असतात. उदा. एखादी विवाहित स्त्री माहेरी आल्यावर कधीही तिची मनस्थिती सांगत नसते, उलट सासरी ती किती समाधानी आहे हेच सांगते कारण तिला तिच्या माता पित्याला दुखवायचं नसतं. हा असतो नं दिसणारा मुखवटा. जो आपल्याला ज्ञात असतो की आपण धारण केलाय आणि हळूहळू आपण हेच आपलं व्यक्तित्व आहे समजून जगत राहतो. यामागे एक कारण असते स्वतःला वाचवणे. मग ते कोणापासूनही असो. मुखवट्याचे असे अनेक पापुद्रे बाजूला करून जे काही उरतं ते उरणं म्हणजे मी असतं. ते ‘मी ‘पण म्हणजेच आकाश असतं. मोकळं आणि विशाल!

भावनांची अभिव्यक्ती झाल्यावर मन आणि शरीर भावविभोर होतं. ही संवेदनशीलता चरित्रनिष्ठेचा पाया असते. ज्यांना दुसऱ्यांची पीडा स्वतःची भासते. ते नेहमीच इतरांना त्रास होऊ नये याची दक्षता घेतात.आत्मवत् सर्वभूते्षु अशी मनस्थिती असते. त्यांच्यात सेवा, सहायता, करुणा, दयेच्या संवेदना सहजच निर्माण होतात. अशा स्तरावरच्या लोकांना आपण महानुभाव, महापुरुष, पुण्यश्लोक, संत (आत्ताचे नाही ) म्हणून संबोधतो. आता प्रश्न हा उरतो की या लोकांनी कधीच मुखवटा धारण केला नसावा का? तर त्याचं उत्तर आहे हो! नक्कीच मुखवटा धारण केला होता. स्वतःचे दुःख, वेदना, यातना आंतरिक दशा समाजापासून लपवून ठेवण्याचा. कबीर, तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, साईबाबा, महात्मा फुले, गाडगेबाबा, सावित्रीबाई, अगदी आत्ताचे डॉ. कलाम, सुधा मूर्ती, बाबा आमटे, मेधा पाटकर या लोकांनी स्वतःची आंतरिक वेदना जगजाहीर केल्याचं माझ्यातरी वाचनात नाही. त्यांच्या अनुयायी मंडळींनी त्यांच्या चरित्रात लिहून ठेवलं असेल किंवा लिहितील तर ही गोष्ट वेगळी.

थोडक्यात मुखवटा हा जगण्याचा अविभाज्य घटक झाला आहे. प्रत्येक व्यक्ती त्याचा उपयोग योग्यतेनुसार करत असतो. अंतत: सगळ्यांची मनस्थिती एकाच विचारावर येऊन स्थगित होते..

मुखोटा पहनकर दिन गुजरता है
रात आकर मुझे बेनकाब करते है!

ऋचा सुनील पारेख, नवी मुंबई.©️®️ 99301 21490 (लेखिका या धुळे येथील ज्येष्ठ साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते स्व. डॉ. मु. ब. शहा यांच्या कन्या असून स्वतः उच्चविद्याविभूषित आहेत.)

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

लेख

सत्यशोधक समाज : शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष

Twitter : @therajkaran लोकहितवादी, महात्मा फुले, न्या रानडे, गोपाळ गणेश आगरकर यांच्याप्रमाणेच मुकुंदराव पाटील यांनी सामाजिक सुधारणेचा पक्ष घेतला. देशाच्या स्वातंत्र्याची कळकळ असणे
लेख

मराठवाडा कात टाकणार!

Twitter : @abhaykumar_d मराठवाड्याच्या कायापालटाचा करण्याचा संकल्प मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी सोडला आहे. ४६