मुंबई – अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सत्ताधारी भाजपने विधानसभेच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला दिली. मात्र, विरोधी पक्षनेतेपदाच्या मागणीवर कोणतीही सकारात्मक भूमिका न घेतल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सरकारने डावलले. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांनी विधानमंडळ परिसरात माध्यमांशी बोलताना सरकारवर प्रखर टीका केली.
आ. खडसे म्हणाले, “लोकशाहीत विरोधी पक्षाची भूमिका तितकीच महत्त्वाची असते जितकी सत्ताधारी पक्षाची. मात्र, आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस असूनही विरोधी पक्षनेत्याची निवड झालेली नाही. हे सरकार जनतेच्या प्रश्नांवर उत्तरदायी राहू इच्छित नाही, म्हणूनच विरोधी पक्षनेत्याच्या निवडीकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे. भ्रष्टाचारावर पडदा टाकण्यासाठी विरोधकांचा आवाज दडपण्याचा हा प्रयत्न आहे.”
आ. खडसे यांनी अधिवेशनाच्या एकूण कामकाजावरही तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “आमदार म्हणून मी पहिल्यांदाच पाहतो आहे की, जनतेच्या प्रश्नांऐवजी इतर विषयांवरच जास्त चर्चा झाली. शेतकरी, कामगार, आणि गोरगरीब जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी सभागृहाचा उपयोग होणे आवश्यक होते, मात्र सत्ताधाऱ्यांनी राजकीय आरोप-प्रत्यारोपांवरच वेळ वाया घालवला.”
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावरील कथित गैरवर्तनाच्या आरोपांबाबतही आ. खडसे यांनी स्पष्ट भूमिका घेतली. त्यांनी सांगितले, “या प्रकरणात तपासाची दिशा दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. जर मंत्री दोषी असतील, तर त्यांच्या विरोधात कठोर कारवाई झालीच पाहिजे. कायदा सर्वांसाठी समान असायला हवा.”
जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेने गैरवर्तनाचा आरोप केला आहे. मात्र, या प्रकरणात महिलेवरच खंडणी वसुलीचा गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर आ. खडसे यांनी “सरकारने न्यायसंगत भूमिका घेतली पाहिजे,” असे ठामपणे सांगितले.
आ. खडसे यांनी केलेल्या या परखड टीकेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करतानाच विरोधकांच्या भूमिकेवरही भाष्य केले. त्यामुळे आगामी काळात सरकार आणि विरोधक यांच्यातील संघर्ष आणखी उग्र रूप धारण करणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.