अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये ट्विटरवॉर सुरू असल्याचं दिसत आहे. बारामतीत अजित पवारांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना नाव न घेता शरद पवारांवर टीका केली होती. त्यावरुन दोघांमध्ये ट्विटरवॉर सुरू झालं आहे.
बारामतीत अजित पवार म्हणाले. ‘लोकसभा निवडणुकीसाठी मी लवकरच उमेदवार जाहीर करणार आहे. त्यावेळी काही लोक येतील भावनिक साद घालतील, ही शेवटची निवडणूक आहे सांगतील. पण तुम्ही मात्र अजित पवार उभा आहे हे समजून मतदान करा. शेवटची निवडणूक सांगतील, कधी शेवटची निवडणूक असेल काय माहीत. ‘
अजित पवारांच्या वक्तव्यानंतर शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांनी राग व्यक्त केला. आज अजित पवारांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना हद्द ओलांडली आहे. एखाद्या माणसाच्या मृत्यूची प्रार्थना करणं, याचना करणं हे माणुसकीला शोभणारं आहे काय याचा विचार अजित पवार यांनी जरुर करावा असं म्हणत आव्हाडांनी पवारांवर टीका केली.
यानंतर पवारांनीही ट्विट करत प्रत्युत्तर दिलं, काल माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढला गेला आहे. माझं पहिल्यापासून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र असल्यापासून एवढंच म्हणणं होतं की, ज्येष्ठ नेत्यांनी शारीरिक दगदगीचा विचार करावा आणि प्रकृतीची काळजी घ्यावी. हे मत मी पूर्वी देखील मांडलेलं आहे. मात्र काही लोक स्वतःच्या राजकारणासाठी ज्येष्ठ नेत्यांचा वापर करू पाहतात. त्यांना ह्या गोष्टी कळणार नाहीत. माझ्या त्यांच्याबद्दलच्या भावना मी वेळोवेळी मांडलेल्या आहेत. पण काही लोकांना ‘ध’ चा ‘मा’ करायची सवयच असते, अशा नाटकीबाज लोकांना मी महत्त्व देत नाही. मात्र सर्वसामान्य लोकांना माझ्या भावना कळाव्यात, म्हणून मी हे म्हणणं मांडत आहे, अशा शब्दात त्यांनी आपली भूमिका मांडली.
अजित पवारांचं प्रत्युत्तर आल्यानंतर जितेंद्र आव्हाडही शांत बसले नाही. त्यांनीही त्यांच्या ट्विटला उत्तर दिलं. ‘नाटकी लोकांना किंमत देत नाही तर खुलासा कशाला करता आहात. साहेबांच्या नावाचा फायदा तुम्हाला किती झाला हा प्रश्न स्वतःच्या मनाला विचारा. तुमच्या मनातले तोंडात आले आणि महाराष्ट्राला सत्य कळले. जाऊ द्या कधी तरी खरा चेहरा बाहेर येतोच. नाहीतर तुम्ही इतकी सारवासारव केली नसती. आणि हो कावळ्याच्या शापानी गाय मरत नसते, असं म्हणत अजित पवारांचा समाचार घेतला.