मुंबई – स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत केलेल्या विडंबनात्मक वक्तव्यावरून सोमवारी विधिमंडळात प्रचंड गदारोळ झाला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत इशारा देत म्हटले, “सुपारी घेऊन कोणी बदनामी करत असेल, तर त्याला सोडणार नाही. अशा लोकांवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल.”
विधानसभा सदस्य अर्जुन खोतकर यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित करताना म्हटले, “कामराने केलेली टिप्पणी निंदनीय आहे. एकनाथ शिंदे हे लोकनेते आहेत. त्यांच्या कार्यक्षमतेची प्रशंसा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांनीही केली आहे. मात्र, कामरा हिंदू देवी-देवतांचा अपमान करतो आणि समाजात तेढ निर्माण करतो. अशा व्यक्तीवर वेळीच कारवाई झाली नाही, तर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. सुपारी घेऊन राज्यात अशांतता निर्माण करण्याचा कामराचा डाव आहे. त्याच्या मास्टरमाइंडचा शोध घ्यावा लागेल आणि खरा सूत्रधार समजल्याशिवाय तो तुरुंगात टाकला गेला पाहिजे,” असेही त्यांनी ठामपणे नमूद केले.
या वक्तव्यावर सत्ताधारी आमदार आक्रमक झाले, त्यामुळे काही काळासाठी सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले.
यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “महाराष्ट्रातील जनतेने २०२४ च्या निवडणुकीत दाखवून दिलंय की कोण खुद्दार आहे आणि कोण गद्दार आहे. आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्य मानणारे आहोत. राजकीय व्यंगावर टीका असेल, तर आम्ही टाळ्या वाजवून दाद देऊ. पण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अतिरेक आणि स्वैराचार सहन केला जाणार नाही.”
ते पुढे म्हणाले, “कुणाल कामराचा इतिहास पाहिला, तर त्याने पंतप्रधान आणि न्यायमूर्तींविषयीही असभ्य भाषा वापरली आहे. देशाच्या न्यायव्यवस्थेबाबत अविश्वास निर्माण करणारी वक्तव्ये केली आहेत. प्रसिद्धी मिळवण्यासाठी तो वादग्रस्त बोलतो. एकनाथ शिंदेंसारख्या लोकनेत्यावर इतक्या खालच्या दर्जाची कॉमेडी करणे अशोभनीय आहे.”
मुख्यमंत्री फडणवीस यांनी इशारा देत सांगितले, “कोणी सुपारी घेऊन राज्यात वातावरण दूषित करत असेल, तर त्याला सोडणार नाही. अशा लोकांना धडा शिकवावा लागेल.”