महाराष्ट्र ताज्या बातम्या

Malegaon : मालेगावमधील रद्द ३२७३ जन्म प्रमाणपत्र धारकांची नावे मतदार यादीतून रद्द करावीत! — भाजप नेते डॉ. किरीट सोमैया यांची मागणी

मुंबई — मालेगाव महानगरपालिकेने फसवणूक, फौजदारी आणि चीटिंगच्या माध्यमातून बेकायदेशीररित्या मिळवलेली ३२७३ जन्म प्रमाणपत्रे रद्द केली आहेत. या संदर्भात, भाजप नेते डॉ. किरीट सोमैया यांनी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक अधिकारी (CEO) एस. चोकलिंगम यांची भेट घेऊन या ३२७३ व्यक्तींची नावे मतदार यादीतून रद्द करण्याची मागणी केली आहे.

डॉ. सोमैया यांनी सांगितले की, मालेगाव महापालिकेने चौकशीदरम्यान उघड केले आहे की या ३२७३ व्यक्तींनी फ्रॉड आणि फसवणुकीच्या माध्यमातून विलंबित जन्म प्रमाणपत्रे मिळवली होती. या प्रक्रियेत त्यांनी निवडणूक ओळखपत्र (EPIC) पुरावा म्हणून दाखवले होते. “आता ही सर्व जन्म प्रमाणपत्रे रद्द झाल्यानंतर त्यांच्याकडे मालेगावमध्ये जन्म झाल्याचा कोणताही वैध पुरावा उरलेला नाही,” असे डॉ. सोमैया म्हणाले.

त्यांनी पुढे नमूद केले की, या फसवणुकीच्या आधारेच काही व्यक्तींनी आधारकार्ड व मतदार ओळखपत्रही मिळवले, त्यामुळे त्यांचे नागरिकत्व संशयास्पद बनले आहे.

या सर्व प्रकरणाची सविस्तर माहिती व पुरावे घेऊन डॉ. किरीट सोमैया यांनी महाराष्ट्र निवडणूक आयोगाचे CEO एस. चोकलिंगम यांची भेट घेतली. ज्यांची जन्म प्रमाणपत्रे रद्द झाली आहेत, त्यांचे नागरिकत्व सिद्ध करणारा कोणताही दस्तऐवज उपलब्ध नाही. त्यामुळे या ३२७३ लोकांची नावे तात्काळ मतदार यादीतून वगळावीत, अशी मागणी सोमैया यांनी केली.

या भेटीत CEO एस. चोकलिंगम यांनी सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले. ते म्हणाले की, संबंधित जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवण्यात येईल आणि सर्व कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल.

डॉ. सोमैया यांनी बिहारमधील विशेष सघन पुनरीक्षण (SIR) चा दाखला देत सांगितले की, निवडणूक आयोगाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे की आधारकार्ड हे केवळ ओळखपत्र आहे, ते ना जन्माचा पुरावा आहे ना नागरिकत्वाचा. त्यामुळे मालेगावमधील या प्रकरणात आधार व मतदार ओळखपत्र या दोन्हींच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सोमैया पुढे म्हणाले, “या ३२७३ लोकांकडे आता जन्म प्रमाणपत्र नाही, त्यांचे आधारकार्डही रद्द होणार आहे. म्हणजेच त्यांचा भारतात कधी आणि कुठे जन्म झाला, याचा कोणताही पुरावा उरलेला नाही. त्यामुळे त्यांच्या नोंदी मतदार यादीतून काढणे अत्यावश्यक आहे.”

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात