मुंबई: भारताचा समुद्री इतिहास तब्बल ५,००० वर्षांचा असून, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश नव्याने समुद्री इतिहास लिहिण्यास सज्ज झाला आहे. “इंडिया मेरीटाइम वीक – २०२५” या उपक्रमातून तब्बल १० लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या संधी निर्माण होतील, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी येथे केला.
सोमवारी ‘इंडिया मेरीटाइम वीक २०२५’चे उद्घाटन गृहमंत्री शाह यांच्या हस्ते गेटवे ऑफ इंडिया येथे पार पडले.
या वेळी उपस्थितांना संबोधित करताना अमित शाह म्हणाले, “गेटवे ऑफ इंडिया येथे हे सम्मेलन आयोजित करण्यात आले आहे आणि या मंथनातून जे विचार समोर येतील, त्यामुळे गेटवे ऑफ इंडिया हे ‘गेटवे ऑफ वर्ल्ड’ मध्ये परिवर्तित होईल.”
गृहमंत्री शाह म्हणाले, “गेल्या दहा वर्षांत मेरीटाइम इकॉनॉमीमध्ये करण्यात आलेल्या सुधारणांमुळे भारत आता जागतिक समुद्री नकाशावर एक उदयोन्मुख शक्ती म्हणून उभा आहे. भारताची सागरी स्थिती, लोकशाही स्थैर्य आणि नौदलाची क्षमता हिंद-प्रशांत आणि ग्लोबल साउथ प्रदेशात विकास, सुरक्षा आणि पर्यावरण संवर्धनासाठी मोठं योगदान देत आहेत.”
त्यांनी पुढे सांगितले की, “भारताच्या समुद्री ताकदीच्या आणि सुरक्षेच्या दृष्टीने देशाची भौगोलिक स्थिती अत्यंत महत्त्वाची आहे. भारताची सागरी किनारपट्टी तब्बल ११,००० किलोमीटर लांब असून, देशात १३ सागरी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आहेत. देशाच्या जीडीपीमध्ये सागरी व्यापाराचा वाटा सुमारे ६० टक्के आहे.”
शाह यांनी नमूद केले की, हिंद महासागरातील २८ देश जागतिक निर्यातीत १२ टक्के योगदान देतात, आणि या पार्श्वभूमीवर ‘इंडिया मेरीटाइम वीक’ भारताच्या सागरी क्षमतेचे जागतिक प्रदर्शन ठरते आहे.
“हिंद-प्रशांत महासागर क्षेत्रात हे सम्मेलन आता सर्वात प्रतिष्ठित व्यासपीठ म्हणून उदयास आले आहे. या चौथ्या आवृत्तीतून ‘विकसित भारत’च्या ध्येयाकडे वाटचाल अधिक वेगाने होईल,” असा ठाम विश्वास शाह यांनी व्यक्त केला.

