नागपूर : जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकांमध्ये महायुतीची एकजूट अबाधित राहील आणि या निवडणुका महायुती एकत्र लढणार, अशी निर्णायक घोषणा महसूलमंत्री आणि भाजपा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली. “५१ टक्के मतांचा टप्पा पार करणे हे आमचे स्पष्ट ध्येय आहे,” असेही त्यांनी सांगितले.
या संदर्भात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि बावनकुळे यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीबाबत माहिती देताना बावनकुळे म्हणाले, “जिल्हा पातळीवरील सर्व नेत्यांना महायुतीची बांधणी मजबूत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. स्थानिक पातळीवर ५–१०% जागांवर मतभेद येऊ शकतात, मात्र अशा जागांवर फडणवीस व शिंदे स्वतः बसून अंतिम निर्णय घेतील.”
मुंबई महापालिकेसाठी महायुतीची तयारी सुरू असल्याचे सांगताना बावनकुळे म्हणाले, “शिवसेनेने ९०–१०० जागांची मागणी केली आहे. मात्र जागावाटपाचा निर्णय तांत्रिक बाबी तपासून घेतला जाईल.”
बीएमसी निवडणुकीसाठी भाजपा व शिवसेनेचे प्रत्येकी चार-पदाधिकारी तसेच महायुतीचे प्रतिनिधी एकत्र बसून निर्णय घेणार. मतभेदाच्या ठिकाणी वरिष्ठ नेते मध्यस्थी करतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महापौरपदाबाबत ते म्हणाले, “मुंबई महापौरपदाचा अंतिम निर्णय फडणवीस–शिंदे–अजित पवार हे तिघे मिळून घेतील.”
अजित पवार महायुतीचा अविभाज्य घटक असल्याचे सांगताना बावनकुळे यांनी स्पष्ट केले, “मागील निवडणुकांमध्ये काही ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये मतभेद झाले होते. पण मनभेद नव्हते. ते मतभेद आता दूर झाले आहेत.”
वेगळ्या विदर्भाच्या प्रश्नावर काँग्रेसवर टीका करत बावनकुळे म्हणाले, “२०१४ पासून फडणवीस सरकारने विदर्भाचा झपाट्याने विकास केला. छोटे राज्य विकसित होऊ शकतात हा भाजपचा ठाम विश्वास आहे. विदर्भाला न्याय देण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत.”
तसेच ते म्हणाले, “विदर्भात सर्वाधिक जंगलक्षेत्र आहे. त्यामुळे वनविभागाचे मुख्यालय (फॉरेस्ट ऑफिस) मुंबईत हलवले जाणार नाही.”

