घरकुल योजनेवरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत सरकारला फटकारले
मुंबई : राज्यात घरकुल योजनेअंतर्गत घरे मंजूर होऊनही गेल्या तीन वर्षांपासून लाभार्थ्यांना निधी न मिळाल्याने गरिबांची मोठी अडचण झाली आहे. या गंभीर मुद्द्यावर बुधवारी विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते Vijay Wadettiwar यांनी आक्रमक भूमिका घेत सरकारला धारेवर धरले.
“तीन पावसाळे झाले. लोक कुठे राहत असतील याचा सरकारने कधी विचार केला आहे का? सरकार म्हणून जनाची नाही, तर किमान मनाची तरी ठेवावी,” अशा शब्दांत वडेट्टीवार यांनी सभागृहात आपला संताप व्यक्त केला.
राज्यात अनेक लाभार्थ्यांना घरकुल योजनेअंतर्गत घरे मंजूर झाली असली, तरी गेल्या तीन वर्षांपासून निधी रखडलेला आहे. अनेकांनी बांधकाम सुरू केले असून, निधीअभावी ही कामे अर्धवट अवस्थेत अडकली आहेत. “घर सोडून लोक कुठे राहत असतील याची सरकारला जाणीव आहे का?” असा थेट सवाल करत, सरकारकडून नेहमी दिल्या जाणाऱ्या ‘लवकरच निधी दिला जाईल’ या उत्तरावरही वडेट्टीवार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
“हा ‘लवकर’ म्हणजे नेमकं कधी? किमान हे अधिवेशन संपेपर्यंत तरी गरिबांच्या खात्यात निधी जमा होणार आहे का?” असा खडा सवाल त्यांनी सरकारला विचारला.
या मुद्द्याची विधानसभा अध्यक्ष Rahul Narvekar यांनी तातडीने गंभीर दखल घेतली. केंद्र सरकारकडून घरकुल योजनेसाठी किती निधी अपेक्षित आहे, तो कधी उपलब्ध होणार आहे, याचा सविस्तर पाठपुरावा करून अधिवेशन संपण्यापूर्वी संपूर्ण माहिती सभागृहासमोर सादर करण्याचे निर्देश त्यांनी शासनाला दिले.

