विधानसभेत Vijay Wadettiwar यांचा सरकारला सवाल
मुंबई –राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना मुंबईतील विधानभवन, मेट्रो स्थानके, मुंबई उच्च न्यायालय आणि शेअर बाजारासारख्या महत्त्वाच्या ठिकाणांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ईमेल मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला.
औचित्याच्या मुद्द्याद्वारे सभागृहाचे लक्ष वेधताना वडेट्टीवार म्हणाले की, अधिवेशन सुरू असताना अशी धमकी मिळणे ही गंभीर बाब असून सरकारने याबाबत तातडीने निवेदन करावे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून ईमेलचा उगम शोधून काढण्याची मागणी त्यांनी केली.
वडेट्टीवार यांनी सांगितले की, या धमकीचा ईमेल ‘खलिस्तान नॅशनल आर्मी’कडून आल्याची चर्चा सुरू असली तरी त्यामागील खरा सूत्रधार कोण आहे, हे शोधणे गरजेचे आहे. सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्याने या घटनेचा कोणत्याही बाह्य घटकांशी संबंध आहे का, याचीही चौकशी झाली पाहिजे, अशी शंका त्यांनी व्यक्त केली.
मुंबईतील महत्त्वाच्या स्थळांना लक्ष्य करणारी धमकी मिळाल्याने राज्यातील सुरक्षाव्यवस्थेबाबत प्रश्न निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले. या ईमेलचा उगम तातडीने शोधून काढून परिस्थितीबाबत सरकारने अधिकृत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.
दरम्यान, या मुद्द्यावर विरोधी पक्षातील सदस्यांनी सभागृहात घोषणाबाजी करत सरकारकडून तत्काळ उत्तराची मागणी केली. या प्रकरणावर सरकार काय भूमिका घेते, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

