महाड: महाड एस.टी. आगारात चालक-वाहकांच्या तीव्र कमतरतेमुळे प्रवाशांचे हाल होत असून, अनेक फेऱ्या रद्द करण्याची वेळ आली आहे. कोकणातील मध्यवर्ती आगार म्हणून ओळख असलेल्या महाडकडे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालयाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप प्रवाशांकडून केला जात आहे.
मुंबई–गोवा महामार्गावरील महाड हे महत्त्वाचे केंद्र असून, रायगड किल्ल्यासह परिसरात दरवर्षी लाखो पर्यटक येतात. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी एस.टी. हीच मुख्य वाहतूक व्यवस्था आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत महाड आगाराला ना नवीन बसेस देण्यात आल्या, ना पुरेसा कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देण्यात आला.
सध्या महाड आगारात सुमारे ८७ पदे रिक्त असून, चालक-वाहकांच्या अभावामुळे लांब पल्ल्याच्या आणि ग्रामीण फेऱ्या मोठ्या प्रमाणात रद्द होत आहेत. परिणामी प्रवाशांना उभ्याने प्रवास करावा लागत असून, मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
शेजारील माणगाव, खेड, चिपळूण आणि दापोली आगारांना पुरेशा सुविधा व कर्मचारी उपलब्ध असताना, त्या आगारांच्या बसेस महाडमधून प्रवास करत पुढे जातात. मात्र, स्थानिक प्रवाशांना त्याचा लाभ होत नसल्याने नाराजी वाढली आहे.
आगारातील मूलभूत सुविधांची स्थितीही चिंताजनक आहे. स्वच्छता कर्मचारी नसल्याने अस्वच्छता वाढली असून, उपहारगृह बंद आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील सामाजिक संस्थांच्या मदतीने चालवावी लागत आहे.
पनवेल मार्गावर बसेस वाढवण्याची मागणी
महाडहून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांनी पनवेलमार्गे रेल्वेचा पर्याय स्वीकारला आहे. त्यामुळे महाड–पनवेल बससेवेची मागणी वाढली आहे. मात्र संध्याकाळी ६ नंतर बस उपलब्ध नसल्याने प्रवासी अडचणीत येतात.
महाड आगारातून नंदुरबार, धुळे, नाशिक, मुंबई, पुणे, जळगाव, औरंगाबाद अशा लांब पल्ल्याच्या गाड्या धावत असल्या तरी चालक-वाहकांच्या अपुऱ्या संख्येमुळे नियोजन करताना अधिकाऱ्यांना कसरत करावी लागत आहे.
महामंडळाकडून उत्पन्न वाढीचे उद्दिष्ट दिले जात असले तरी, कर्मचारीच अपुरे असताना उत्पन्न कसे वाढवायचे, असा सवाल उपस्थित होत आहे.

