SEIL@60, मिशन साहसी आणि ‘स्क्रीन टाइम टू ॲक्टिव्हिटी टाइम’ अभियानाची माहिती; पंजाब विद्यापीठासाठी विद्यार्थी प्रतिनिधित्व, वसतिगृह विस्तार व AI केंद्राची मागणी
नवी दिल्ली: अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) शिष्टमंडळाने राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. रघुराज किशोर तिवारी आणि राष्ट्रीय महामंत्री डॉ. वीरेंद्र सिंह सोलंकी यांच्या नेतृत्वाखाली भारताचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांची सदिच्छा भेट घेतली. उपराष्ट्रपतीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर अभाविपच्या शिष्टमंडळासोबत झालेली ही पहिली औपचारिक भेट होती. यावेळी शिष्टमंडळाने त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. बैठकीत युवा वर्गाची राष्ट्रनिर्माणातील भूमिका, उच्च शिक्षण क्षेत्रातील आव्हाने आणि विद्यार्थी हिताशी संबंधित विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
शिष्टमंडळाने अभाविपच्या देशभरातील संघटनात्मक विस्ताराची, विद्यार्थी हितासाठी राबविलेल्या आंदोलनांची आणि राष्ट्रीय जीवनातील विविध क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांच्या विधायक सहभागाची माहिती उपराष्ट्रपतींना दिली. यावेळी अभाविपच्या ‘स्टुडंट्स एक्स्पिरियन्स इन इंटरस्टेट लिव्हिंग’ (SEIL) या उपक्रमाला यंदा ६० वर्षे पूर्ण होत असल्याची माहिती देण्यात आली. या उपक्रमामुळे देशातील विविध भागांतील विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक संवाद, भावनिक एकात्मता आणि राष्ट्रीय ऐक्य बळकट झाल्याचे शिष्टमंडळाने नमूद केले.
विद्यार्थ्यांमध्ये वाढत असलेल्या डिजिटल अवलंबित्वाच्या पार्श्वभूमीवर अभाविपच्या ‘स्क्रीन टाइम टू ॲक्टिव्हिटी टाइम’ अभियानाची माहितीही देण्यात आली. मोबाईल आणि स्क्रीनवरील वेळ कमी करून विद्यार्थ्यांनी क्रीडा, सामाजिक कार्य आणि इतर विधायक उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे, हा या अभियानाचा उद्देश असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
याशिवाय गुरु तेगबहादूर यांच्या ३५० व्या बलिदान वर्षानिमित्त, संत रविदास यांच्या ६५० व्या जयंतीनिमित्त तसेच वीरांगना राणी अब्बक्का यांच्या कार्यावर आधारित देशव्यापी उपक्रमांची माहितीही शिष्टमंडळाने दिली. महिला सुरक्षा आणि सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन साहसी’ अभियानांतर्गत आतापर्यंत १० लाखांहून अधिक विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
बैठकीत पंजाब विद्यापीठाशी संबंधित विविध मागण्याही मांडण्यात आल्या. विद्यापीठाच्या सिनेटमध्ये निवडून आलेल्या विद्यार्थी प्रतिनिधींना प्रतिनिधित्व मिळावे, वाढत्या विद्यार्थी संख्येनुसार वसतिगृह सुविधांचा विस्तार व्हावा आणि रिक्त प्राध्यापक पदांवर वेळेत नियुक्त्या करण्यात याव्यात, अशी मागणी अभाविपने केली. त्याचबरोबर कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानासाठी अत्याधुनिक केंद्र स्थापन करणे, योग व माइंडफुलनेस केंद्र सुरू करणे आणि कायमस्वरूपी समुपदेशकांसह विद्यार्थी कल्याण व मानसिक आरोग्य सहाय्य केंद्र उभारण्याचीही मागणी करण्यात आली.
यावेळी अभाविपचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. वीरेंद्र सिंह सोलंकी म्हणाले, “माननीय उपराष्ट्रपतींसोबत झालेली ही बैठक अत्यंत सकारात्मक आणि प्रेरणादायी ठरली. SEILच्या ६० वर्षांच्या प्रवासापासून मिशन साहसी, ‘स्क्रीन टाइम टू ॲक्टिव्हिटी टाइम’ अभियान आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाशी संबंधित विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली. पंजाब विद्यापीठातील विद्यार्थी प्रतिनिधित्व, वसतिगृह विस्तार, प्राध्यापक पदभरती, AI केंद्राची स्थापना आणि विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी आवश्यक सुविधा याबाबतही आम्ही भूमिका मांडली. गुणवत्तापूर्ण शिक्षण, पुरेशा सुविधा आणि सहभागात्मक प्रशासन ही उच्च शिक्षण संस्थांची प्रमुख उद्दिष्टे असली पाहिजेत. या संवादामुळे विद्यार्थी कल्याण, युवा सक्षमीकरण आणि राष्ट्रनिर्माणाला नवी दिशा मिळेल, असा आम्हाला विश्वास आहे.”
या शिष्टमंडळात राष्ट्रीय सहसंघटन मंत्री एस. बालकृष्ण, राष्ट्रीय मंत्री क्षमा शर्मा, पायल किनाके, आदित्य तकियार, दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघाचे माजी सचिव मित्रवृंदा कर्णवाल तसेच पंजाब विद्यापीठ विद्यार्थी संघाचे अध्यक्ष गौरववीर सोहल यांचा समावेश होता.


Mitchell Shaub
June 26, 2026You are my breathing in, I own few web logs and rarely run out from post :). “To die for a religion is easier than to live it absolutely.” by Jorge Luis Borges.