मुंबई : जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथे कथित बनावट तूप निर्मिती करणाऱ्या कारखान्यावर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली आहे. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच संबंधित आस्थापनेचा परवाना कायमचा रद्द करण्यात येईल, अशी घोषणा अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी शुक्रवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली.
या प्रकरणी सदस्य प्रकाश सोळंके यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
मंत्री झिरवाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने तीर्थपुरी येथील मे. मुंदडा इंडस्ट्रीज या आस्थापनेवर छापा टाकला. तपासणीदरम्यान तुपामध्ये खाद्यतेल आणि तुपाचा फ्लेवर असलेले इसेन्स मिसळून बनावट तूप तयार करण्यात येत असल्याचे प्राथमिक तपासणीत निष्पन्न झाले.
या कारवाईदरम्यान एकूण आठ अन्नपदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले आहेत. पॅकबंद स्वरूपातील १,१२१.८ लिटर तूप, खुल्या स्वरूपातील ६६३.८ लिटर तूप आणि ११८ लिटर रिफाइंड सोयाबीन तेल असा एकूण १३.०४ लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे.
सर्व नमुने अन्न व औषध प्रशासनाच्या छत्रपती संभाजीनगर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ आणि संबंधित नियमांनुसार पुढील कारवाई करण्यात येईल, असे झिरवाळ यांनी स्पष्ट केले.
तपासणीदरम्यान आढळलेल्या त्रुटींमुळे संबंधित आस्थापनेचा अन्न परवाना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आला असून आस्थापना सील करण्यात आली आहे. पुढील प्रक्रियेनंतर परवाना कायमचा रद्द करण्यात येईल, असेही मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितले.

