Twitter : @NalavadeAnant
मुंबई
देवेंद्र फडणवीस 2014 मध्ये राज्याचे मुख्यमंत्री झाल्यापासूनच महाराष्ट्र जातीपाती वाटला गेला, असा गंभीर आरोप उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बुधवारी येथे प्रसार माध्यमांशी बोलताना केला.
सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात धार्मिक मुद्द्यांवरून दोन समाजात संघर्ष झाला. राज्यात विविध ठिकाणी सामाजिक अशांतता आहे. या मुद्द्यावरून राऊत यांनी भाजपवरही निशाणा साधला.
महाराष्ट्रातील वातावरण असे कधीच नव्हते. अस्थिर आणि असुरक्षित जातीपातीमध्ये वाटलेले सध्याचे वातावरण आहे. या सर्वांना जबाबदार भाजपच आहे. ज्या दिवसापासून महाराष्ट्रात देवेंद्र फडणीस मुख्यमंत्री झाले तेव्हापासून महाराष्ट्र जातीपातीमध्ये वाटला गेला. या महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब ठाकरे या नेत्यांनी महाराष्ट्र एकसंध ठेवला, ते त्यांचे कौशल्य होते. पण गेल्या दहा वर्षांमध्ये हा महाराष्ट्र फाटला गेलेला असून जाती-धर्मानुसार महाराष्ट्राचे तुकडे पडत असल्याची खंतही राऊत यांनी व्यक्त केली.
हेच देवेंद्र फडणवीस राज्य मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत आम्ही धनगरांना आरक्षण देऊ असे सांगत होते. हेच फडणवीस महाविकास आघाडीचे अडीच वर्षे सरकार असताना आमची सत्ता आली तर मराठा समाजाला २४ तासात आरक्षण देऊ असे सांगत होते. मग आता आरक्षण का देत नाहीत? असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला.