Twitter : @NalavadeAnant
मुंबई
पालघर जिल्ह्यातील वाढवण (Vadhvan Port, Palghar) येथे प्रस्तावित असलेल्या बंदराला स्थानिकांचा प्रचंड विरोध होत आहे. हा विरोध डावलून सरकारला हा प्रकल्प रेटुन न्यायचा आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि लोकांचा विरोध लक्षात घेऊन राज्य शासनाने २४ डिसेंबर रोजी वाढवण बंदर संदर्भात जनसुनावणी आयोजित केली आहे.
दरम्यान, या जनसुनावणी आधी जवाहरलाल नेहरु प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या सादरीकरणाचा अभ्यास करुन एक बैठक आयोजित करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण Minister Ravindra Chavan) यांनी आज दिले. वाढवण बंदर प्रकल्पासंदर्भात चर्चा करण्यासाठी मंत्रालयात पालघर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची बैठक मंत्री चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. या बैठकीला खासदार राजेंद्र गावित (MP Rajendra Gavit), आमदार निरंजन डावखरे, आमदार राजेश पाटील, आमदार विनोद निकोले, आमदार श्रीनिवास वनगा, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार क्षितिज ठाकूर व आमदार सुनील भुसारा हे दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते. यावेळी पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जवाहरलाल नेहरु प्राधिकरणाचे अध्यक्ष संजय सेठी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
वाढवण बंदर प्रकल्प हा फक्त राज्याच्या नव्हे, तर देशाच्या विकासाच्यादृष्टीने महत्त्वाचा व हिताचा तसेच रोजगार वृद्धी करणारा प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे पालघर जिल्ह्यातील भूमिपुत्रांना रोजगाराचे (employment generation for son of soil) साधन उपलब्ध होणार आहे. स्थानिकांनाही या प्रकल्पाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराची (self employment) संधी उपलब्ध होणार आहे. येथील एकही प्रकल्पबाधित विस्थापित होणार नाही व त्यांचे योग्य पध्दतीने पुनर्वसन करण्यात येईल, अशी ग्वाही मंत्री चव्हाण यांनी दिली. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी सर्वांनी समन्वयाने सकारात्मकरित्या मार्ग काढला पाहिजे. पालघर जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन हा प्रकल्प यशस्विरित्या पूर्णत्वास नेला पाहिजे, अशी अपेक्षा मंत्री चव्हाण यांनी व्यक्त केली.
प्राधिकारणाचे अध्यक्ष संजय सेठी (IAS Sanjay Sethi) यांनी वाढवण बंदर प्रकल्पाचे सादरीकण केले. या सादरीकरणाच्या माध्यमातून प्रकल्पाचा आराखडा, मूळ उद्देश, भविष्यात प्रकल्प उभारणीचे टप्पे, बंदर उभारणीसाठी केलेला अभ्यास आदी सर्व बाबींची माहिती देण्यात आली. प्रकल्पाबाबत कोणाचे काही प्रश्न असतील तर ते समजावून घेण्यात येतील व त्यामधून सकारात्मकरित्या मार्ग काढण्यात येईल, असेही मंत्री चव्हाण यांनी सांगितले