दिल्ली
लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपसाठी चांगली बातमी समोर आली आहे. मध्य प्रदेशात भाजप पुन्हा एकदा बहुमत मिळवताना दिसत आहे. तर दुसरीकडे राजस्थानातदेखील भाजप पाच वर्षांनी पुन्हा एकदा सत्तेत येण्याची शक्यता आहे. छत्तीसगडमध्येही भाजपने गेल्या निवडणुकीच्या तुलनेत चांगली कामगिरी केली आहे.
आतापर्यंतच्या निकालांचा कल पाहता, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजप सत्ता स्थापन करू शकते. छत्तीसगडमध्ये काही अंशी स्पष्टता आहे. या तिन्ही राज्यात भाजपच्या कामगिरीमुळे पुन्हा एकदा मोदी ब्रँडची चमक पाहायला मिळत आहे.
आताच्या आकड्यांनुसार, मध्य प्रदेशात (२३०) भाजपला १५९, काँग्रेसला ६८ तर ३ जागा इतर पक्ष
राजस्थानात १९९ जागांपैकी भाजप ११४, काँग्रेस ७१ आणि १४ इतर पक्ष
छत्तीसगडमध्ये ९० जागांपैकी भाजपला ५४, काँग्रेसला ३४ आणि २ जागा इतर पक्ष
तेलंगणात ११९ जागांपैकी ३७ बीआरएस, ०७ भाजप, ७२ काँग्रेस, ०३ एमआयएम आणि इतर पक्ष.
तिन्ही राज्यांमध्ये भाजपने निवडणुकीची तिकीटं काही महिन्यांपूर्वीच वाटली होती. मात्र मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित केला नव्हता. जिथं २०१८ मध्ये भाजपने मध्य प्रदेशात शिवराज सिंह चौहान, राजस्थानात वसुंधरा राजे आणि छत्तीसगडमध्ये रमन सिंह यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित केला होता. परिणामी, तिन्ही राज्यात भाजपला अपयश मिळालं. मात्र यंदा भाजपने असं केलं नाही. भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर निवडणूक लढली आणि त्याचा परिणाम दिसून आला.
हिंदी पट्ट्यातील या तिन्ही राज्यात पंतप्रधान मोदींनी मोठ्या संख्येने रॅली आणि रोड शो घेतले होते. निवडणुकीच्या घोषणादेखील मोदींशी संबंधित ठेवण्यात आले होते. मध्य प्रदेशात ‘एमपी के मन मे मोदी है’ आणि राजस्थानात ‘मोदी साथे अपनो राजस्थान’ असे नारे देण्यात आले होते.
या तिन्ही राज्यात २ ते २७ नोव्हेंबरदरम्याना नरेंद्र मोदींनी ४२ रॅली आणि चार मोठे रोड शो घेतले. सर्वाधिक जोर हा मध्य प्रदेश आणि राजस्थानात होता.
मध्य प्रदेशात पंतप्रधान मोदींनी १५ रॅली, इंदूरमध्ये मोठा रोड शो घेतला. तर राजस्थानात १५ रॅली आणि जयपूर आणि बिकानेरमध्येही रोड शोंचं आयोजन करण्यात आलं. तर छत्तीसगडमध्ये मोदींच्या चार रॅली झाल्या.
मतमोजणीदरम्यान मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की, एमपीच्या मनात मोदीजी आहेत आणि मोदींच्या मनात एमपी. त्यांच्यावर श्रद्धा आणि विश्वास आहे. त्यांनी इथं सार्वजनिक रॅली घेतल्या आणि जनतेकडे अपील केली. सध्याचा निकाल त्याचा परिणाम आहे.