अयोध्या
अयोध्येत रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठेची तयारी मोठी जोमात सुरू आहे. २२ जानेवारी रोजी राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे. उद्घाटन सोहळ्यात सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे, अधीर रंजन चौधरींसह अनेक विरोधी पक्ष नेत्यांना आमंत्रण पाठवण्यात आलं आहे. तर दुसरीकडे शिवसेना आणि सीपीएमच्या नेत्यांना या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आलं नाही.
यावरुन संजय राऊतांनी भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. तर उद्धव ठाकरे म्हणाले, त्यांना राम मंदिराच्या उद्घाटनाचं निमंत्रण मिळालेलं नाही. यावर थेट अयोध्येचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास म्हणाले, निमंत्रण केवळ त्यांनाच देण्यात आलं, जे भगवान रामाचे भक्त आहेत.
पुजारी सत्येंद्र दास म्हणाले,
भाजप राम मंदिराच्या नावावर राजकारण करीत आहे, असे राऊतांचे वक्तव्य चुकीचं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सर्वत्र आदर होत आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळात मोठं काम करून दाखवलं आहे. हे राजकारण नाही, भक्ती आहे. राहिला मुद्दा काहींना न बोलावण्यात, तर जे रामभक्त आहेत, त्यांनाच निमंत्रण देण्यात आलं आहे.