रत्नागिरी– राज्यातील भाजपा-युती सरकारने शेतकऱ्यांना फसवले, कर्जमाफी दिली नाही, शेतमालाला भाव नाही, आणि ‘लाडकी बहिणी’ योजनेंतर्गत १० लाख लाभार्थींना वंचित ठेवले. मंत्र्यांमध्ये बेबनाव असून, सत्तापिपासू वृत्तीमुळे हे सरकार ‘गँग्ज ऑफ वासेपूर’सारखे टोळ्यांचे आहे, असा घणाघाती हल्ला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा
राज्यात कायदा-सुव्यवस्था कोलमडली आहे. बीडमध्ये सरपंचाची निर्घृण हत्या झाली, एका मंत्र्याने खोटी कागदपत्रे दिली, तर सिंधुदुर्गचे पालकमंत्री सातत्याने वादग्रस्त विधाने करत आहेत. शिवाजी महाराजांबद्दल चुकीची माहिती पसरवण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. कोकणातील खनिजसंपत्ती उद्योगपतींना देण्यासाठी समाजात फूट पाडली जात आहे, असा आरोप सपकाळ यांनी केला.
औरंगजेबाची कबर – शिवरायांच्या शौर्याचे प्रतीक
औरंगजेब हा क्रूर शासक होता, परंतु मराठ्यांनी त्याला याच भूमीत गाडले. भाजपाला शिवरायांचा इतिहास पुसायचा आहे, म्हणूनच त्यांचेच लोक औरंगजेबाच्या कबर उखडण्याची भाषा करत आहेत. औरंगजेबाचे उदात्तीकरण कोणीही करू नये, पण भाजपाच ते प्रायोजित करत आहे, असे सपकाळ म्हणाले.
शिवेंद्रराजेंना सवाल
शिवाजी महाराजांचा सातत्याने अपमान करणाऱ्यांना भाजपा संरक्षण देते, पुरस्कार देते. अशा सरकारमध्ये राहून शिवेंद्रराजे भोसले हे अपमान सहन का करत आहेत? त्यांनी राजीनामा द्यावा, असे आवाहन सपकाळ यांनी केले.
कोकणात काँग्रेस मजबूत करण्याचा निर्धार
युतीच्या राजकारणामुळे कोकणात काँग्रेसला मर्यादा आल्या. मात्र, आता संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, लवकरच कोकणात पक्ष बळकट करण्यासाठी व्यापक योजना राबवली जाईल, असे सपकाळ यांनी स्पष्ट केले.
यावेळी ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई, आमदार भाई जगताप, प्रदेश उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.