ठाणे – श्रमिकांची कला पुढील पिढीपर्यंत पोहोचली पाहिजे. जीपीटीच्या युगात कृत्रिम ट्यून मिळते, पण सृजनशील ट्यून श्रमिक कलावंतच बनवू शकतो. त्यांच्या कलेला घामाचा सुगंध असतो, असे गौरवोद्गार सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी काढले.
श्रमिक कला महोत्सवाचे उद्घाटन
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कलादालन, ठाणे येथे श्रमिक कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी मंत्री शेलार म्हणाले, गेल्या ८५ दिवसांत १७० सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले असून, पुढील ३६५ दिवसांत १२०० कार्यक्रम होणार आहेत.
लोककलेचे पुनरुज्जीवन आणि श्रमिक कलेला मान
शेलार म्हणाले, “लुप्त होत चाललेल्या लोककलांचे पुनरुज्जीवन आणि अन्य कलांना प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी सरकार प्रामाणिक प्रयत्न करत आहे. महाराष्ट्राची संस्कृती देशभर पोहोचवण्यासाठी संगीत, नाटक, लोककला, लोकवाद्य आणि कार्यशाळांचे आयोजन केले जात आहे.”
श्रमिक कलेचा वेगळा सुगंध
विदेशात कितीही डॉलर्स खर्च केले तरी श्रमिक कलावंतांची कला निर्माण करता येत नाही. श्रमिकांच्या मेहनतीची जोड असलेल्या कलेला वेगळाच सुगंध असतो, असे शेलार म्हणाले.
१०० हून अधिक श्रमिक कलावंतांचा सहभाग
या महोत्सवात कचरा वेचक, सफाई सेविका, घरकाम करणाऱ्या महिला, तृतीयपंथी, तमाशा कलाकार, गोंधळी, संबळ वादक, अंध-अपंग कलाकार, पोतराज, वासुदेव, कोळी बांधव, तारपा वादक असे १०० हून अधिक श्रमिक कलावंत आपली कला सादर करणार आहेत.
गुणीजनांचा सन्मान
यावेळी खासदार नरेश म्हस्के, भाजपा ठाणे शहराध्यक्ष संजय वाघुळे, संदीप लेले, सांस्कृतिक विभागाचे सहसंचालक श्रीराम पांडे, समर्थ भारत व्यासपीठाचे संचालक सुरेंद्र वैद्य, उल्हास कार्ले, मुख्य कार्यकारी अधिकारी भटू सावंत आदी उपस्थित होते. श्रमिक कलेसाठी योगदान देणाऱ्या ६ गुणीजनांचा शेलार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
श्रमिक कलावंतांच्या सादरीकरणाने हा दोन दिवसांचा महोत्सव रंगणार आहे.