मुंबई: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीव्र शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. सपकाळ यांच्या वक्तव्याला त्यांनी “बालिश, बेजबाबदार आणि महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला काळीमा फासणारं” असे संबोधले आहे.
बावनकुळे म्हणाले, “औरंगजेब हा क्रूर, अत्याचारी आणि धर्मांध शासक होता, ज्याने हिंदू धर्म आणि हिंदुस्थानच्या अस्मितेवर आघात केले. अशा व्यक्तीची तुलना देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या लोकशाहीवादी, सक्षम आणि विकासाभिमुख नेत्याशी करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा बालिश प्रयत्न आहे.”
ते पुढे म्हणाले, “औरंगजेबाने धर्माच्या नावावर हिंदूंचे शिरकाण केले, मंदिरे पाडली आणि कर लादले. पण फडणवीस हे सर्वांना सोबत घेऊन कायद्याच्या चौकटीत राहून राज्य चालवत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली हिंदू धर्माला अभिमानाने उभे राहण्याची संधी मिळाली आहे.”
बावनकुळे यांनी काँग्रेसवर हल्लाबोल करताना म्हटले की, “सपकाळ आणि काँग्रेसने खालची पातळी गाठली आहे. त्यांच्या या बालिश मानसिकतेमुळे काँग्रेसला स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडावे लागत आहे. अशा हास्यास्पद वक्तव्यांद्वारे ते चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे आणि ती काँग्रेसला योग्य जागा दाखवून देईल.”
सपकाळ यांच्या वक्तव्यावरून राजकीय वादंग
बावनकुळे यांनी सपकाळ यांच्या वक्तव्याला “महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान” असे संबोधले असून, “काँग्रेसच्या अशा वर्तनामुळे राज्यातील राजकीय संस्कृतीला धक्का बसला आहे,” असेही ते म्हणाले.
सपकाळ यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात तणाव निर्माण झाला असून, यावर भाजप आणि काँग्रेसमध्ये वाद सुरू झाला आहे. आगामी काळात या प्रकरणावर आणखी तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.