मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पात अदानी समूहाला १४ कोटी चौरस फूट जमीन देऊन सरकारने मुंबईकरांशी विश्वासघात केला आहे, असा आरोप काँग्रेसच्या आमदार डॉ. ज्योती एकनाथ गायकवाड यांनी केला. या पार्श्वभूमीवर त्यांनी अनोख्या पद्धतीने सरकारचा निषेध नोंदवत टी-शर्ट आंदोलन केले.
या टी-शर्टवर “अदानीला जमिनी देऊन मुंबईकरांचा विश्वासघात”, “जनतेचे नव्हे, अदानीचे सरकार”, “अदानी सरकार, जवाब दो!” असे मजकूर छापण्यात आले होते. तसेच, सरकारला चार थेट प्रश्न विचारण्यात आले.
सरकारला विचारले चार सवाल :
1️⃣ ४०% सर्वेक्षणही झाले नाही, मग मास्टर प्लॅन तयार कसा?
2️⃣ मास्टर प्लॅनवर लोकांचा अभिप्राय नको?
3️⃣ अदानीला धारावीच्या सहापट जागा, धारावीकरांना बाहेरचा रस्ता – हा तर विनाश नाही का?
4️⃣ विरोध केला तर बेदखल करणार.. असा तुघलकी GR का?
यावेळी डॉ. गायकवाड यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत “हा प्रकल्प धारावीकरांच्या हिताचा नसून, अदानी समूहाच्या फायद्यासाठी आखण्यात आलेला कट आहे” असा आरोप केला. धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली मुंबईतील गरीब आणि मध्यमवर्गीय जनतेला झोपडपट्टीबाहेर ढकलण्याचे काम सुरू असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
“मुंबईकरांच्या जमिनी अदानी समूहाला देऊन त्यांचा हक्क हिरावून घेतला जात आहे. सरकार जनतेच्या नव्हे, तर अदानीच्या बाजूने उभे आहे,” असा घणाघात करत त्यांनी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला.