महिलांना समानतेच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध – वनमंत्री गणेश नाईक
ठाणे : सक्षम नसलेल्या महिला भगिनींना राजकीय, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सबळ करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी केले.
महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) यशस्वी ५० वर्षांच्या पूर्णत्वानिमित्त “माविम सुवर्ण महोत्सव – नव तेजस्विनी २०२५” या विशेष उपक्रमाचे उद्घाटन आज नवी मुंबईतील वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात त्यांच्या हस्ते झाले.
दि. २० ते २५ मार्च २०२५ दरम्यान आयोजित या प्रदर्शनात ग्रामीण भागातील बचतगटांनी तयार केलेल्या विविध वस्तू, खाद्यपदार्थ व गृहउपयोगी साहित्याचे स्टॉल लावण्यात आले आहेत. उद्घाटनानंतर श्री. नाईक यांनी प्रदर्शनातील स्टॉलना भेट देत उत्पादनांची माहिती घेतली.
महिला सबलीकरणासाठी शासनाचा दृढ संकल्प
या सोहळ्याला महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, आमदार प्रशांत ठाकूर, महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव, महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आव्हाडे, तसेच इफाडच्या राष्ट्रीय समन्वयक मीरा मिश्रा यांसह विविध क्षेत्रांतील मान्यवर व राज्यभरातील बचतगटांच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आली.
महिला मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली माविमच्या कार्यास गती – गणेश नाईक
वनमंत्री गणेश नाईक म्हणाले, “आदिती तटकरे व मेघना साकोरे-बोर्डीकर या महिला मंत्र्यांच्या नेतृत्वामुळे माविमच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाला अधिक चांगली गती मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना सक्षम करण्यासाठी केवळ संकल्प केला नाही, तर ठोस पावलेही उचलली आहेत. जलजीवन मिशनसारख्या योजनांद्वारे महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागू नये, यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत. महाराष्ट्र सरकारदेखील महिलांच्या विकासासाठी ठोस भूमिका घेत आहे.”
माविम – एक आदर्श मॉडेल : आदिती तटकरे
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी माविमच्या यशामागील प्रयत्नांची आठवण करून देत सांगितले की, “माविमच्या माध्यमातून २० लाखांहून अधिक महिला सहभागी झाल्या आहेत. माविम हे कोणावरही अवलंबून न राहता महिलांना स्वयंपूर्ण बनविणारे मॉडेल आहे. बचतगटांच्या कर्ज परतफेडीचा दर ९९.०५% आहे, याचा अभिमान वाटतो.”
तटकरे पुढे म्हणाल्या, “सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आम्ही प्रस्ताव सादर केला आहे, की प्रत्येक ३५-५० किमी अंतरावर महिलांसाठी स्वच्छ शौचालये बांधण्यात यावीत. त्याचबरोबर, त्या ठिकाणी माविमच्या महिला बचतगटांचे स्टॉल उभारले जावेत, जेणेकरून या स्टॉलवरील उत्पादनांच्या विक्रीतून शौचालयांच्या देखभालीचा खर्च भागविता येईल. याशिवाय, तालुक्याच्या प्रत्येक नगरपंचायतीच्या बाजारपेठेत ‘अस्मिता भवन’ उभारण्यात येणार असून, त्यामध्ये माविमच्या महिलांची उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध असतील.”
महिला सबलीकरणाचे नवे उद्दिष्ट
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी माविमच्या विस्ताराच्या मागणीला मान्यता दिली आहे. त्यामुळे महिलांची संख्या २० लाखांवरून ५० लाखांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठरवले आहे,” असेही तटकरे यांनी स्पष्ट केले.
स्त्रीशक्तीचे महत्व अधोरेखित – मेघना साकोरे-बोर्डीकर
राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी अंतराळवीर सुनिता विल्यम्स यांचा दाखला देत स्त्रियांच्या इच्छाशक्ती व चिकाटीचे महत्त्व अधोरेखित केले. “माविमच्या महिलांनी केलेल्या संघर्षामुळेच आज त्यांनी स्वतःचे स्थान निर्माण केले आहे, याचा अभिमान वाटतो,” असे त्यांनी सांगितले.
महिला उद्योजकांचा गौरव
कार्यक्रमात माविमच्या माध्यमातून विशेष कामगिरी करणाऱ्या रमा कांबळे, स्वाती विठ्ठल शेळके, वैशाली वसंत पाटील, रोहिणी भानुदास कुसमागडे, शशिकला नारायण डांगे, मंजुताई राजेंद्र ठाकरे, संगीता कोळी या महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी माविमच्या यशकथा व उत्पादने याची माहिती देणाऱ्या तीन कॅटलॉगचे प्रकाशनही करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव यांनी केले.