मुंबई – वारंवार गोहत्या आणि गोतस्करीच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींवर संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई केली जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली.
विधायक संग्राम जगताप यांनी अहिल्यनगर (जि. श्रीगोंदा) येथील ससाणेनगर भागात घडलेल्या वाद, मारहाण आणि त्यातून झालेल्या मृत्यूप्रकरणी लक्षवेधी सूचना मांडली. या घटनेत फटाके वाजवण्यावरून मातंग समाजातील ससाणे आणि इतर ११ जणांना मारहाण झाली, त्यानंतर ससाणे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात स्थानिक पोलिसांनी सव्वा महिन्यानंतर गुन्हा दाखल केला, तसेच कुरेशी कुटुंबाच्या गुन्हेगारी वर्चस्वाची दहशत आहे, असा आरोप जगताप यांनी केला.
जगताप यांनी विधानसभेत मांडलेल्या माहितीनुसार, कुरेशी गँगवर १८ ते २० गुन्हे दाखल असून, त्यांचा जिल्ह्यात गोतस्करी आणि गोहत्येचा मोठा व्यवसाय आहे. तसेच, स्थानिक पोलीस निरीक्षकांच्या हलगर्जीपणामुळे कारवाई उशिरा झाली, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. यासोबतच, गोहत्या आणि गोतस्करी विरोधात कठोर कायदा करण्याची मागणीही त्यांनी केली.
यावर उत्तर देताना गृहराज्यमंत्री (ग्रामीण) पंकज भोयर यांनी सांगितले की, या प्रकरणात कुणीही गुन्हा नोंदवण्यासाठी पुढे न आल्याने पोलिसांनी स्वतः गुन्हा नोंदवला. तसेच, एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. गोतस्करीच्या प्रकरणात संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेच्या उत्तरात स्पष्ट केले की, वारंवार गोहत्या आणि गोतस्करीचे गुन्हे करणाऱ्यांवर मकोका अंतर्गत कठोर कारवाई केली जाईल.