मुंबई– महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) माध्यमातून राज्यसेवेत अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या युवकांना न्याय मिळावा, यासाठी एमपीएससीच्या तीन रिक्त सदस्यपदांवरील नियुक्ती तातडीने करण्यात यावी, अशी विनंती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली आहे.
या नियुक्त्या तातडीने झाल्यास परीक्षा, मुलाखती आणि निकाल प्रक्रियेला वेग येईल, तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल, असेही पवार यांनी पत्रात नमूद केले आहे.
एमपीएससीद्वारे उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, पोलिस निरीक्षक, प्राध्यापक यांसारख्या महत्त्वाच्या पदांवर नियुक्त्या केल्या जातात. आयोगात एक अध्यक्ष आणि पाच सदस्यांच्या नियुक्त्यांना मान्यता आहे. मात्र, सध्या अध्यक्ष आणि दोन सदस्य कार्यरत असले तरी उर्वरित तीन सदस्यपदे रिक्त आहेत. त्यामुळे आयोगाच्या कामकाजावर विपरीत परिणाम होत असून परीक्षांना विलंब होत आहे. मुलाखती व निकाल प्रक्रिया रखडल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे.
विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि विविध संघटनांनी या रिक्त पदांवरील नियुक्त्यांसाठी निवेदनांद्वारे सातत्याने मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून “एमपीएससीतील तीन सदस्यांची रिक्त पदे तातडीने भरावीत,” असा पुनरुच्चार केला आहे.