मुंबई : राज्यात बेकायदेशीररित्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांना पश्चिम बंगाल, आसाम आणि कर्नाटक येथून आधारकार्ड व अन्य कागदपत्रे मिळाल्याचे तपासात उघड झाले आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी आज विधानसभेत दिली. सोलापूरमध्ये १२ आणि मुंबई व बंगलोरमध्ये आणखी दोघांना अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आमदार सुभाष देशमुख यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडत सोलापूर एमआयडीसी आणि कणबस (दक्षिण सोलापूर) परिसरात बेकायदेशीररित्या आलेले बांगलादेशी मोठ्या संख्येने राहत असल्याचे निदर्शनास आणले. तसेच, हे घुसखोर स्थानिक कागदपत्रे मिळवून राज्यात राहत असल्याचा गंभीर प्रकारही त्यांनी अधोरेखित केला.
गृहराज्यमंत्री भोयर यांनी उत्तर देताना सांगितले की, एमआयडीसी अक्कलकोट रोड येथील एका कारखान्यात १२ बांगलादेशी अनधिकृतरित्या राहात असल्याची माहिती मिळाल्यानंतर दहशतवाद विरोधी पथक आणि पोलिसांनी कारवाई केली. त्यांच्या जबाबानंतर बंगलोर आणि भिवंडी येथून आणखी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले.
तपासादरम्यान आरोपींकडून १२ मोबाईल, सिमकार्ड, आधारकार्ड, पॅनकार्ड आणि पासपोर्ट जप्त करण्यात आले असून, एकूण किंमत ६८,५०० रुपये आहे. संबंधित कंत्राटदारालाही अटक करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.
राज्यात कोणालाही कामावर घेताना हमीपत्र घेणे बंधनकारक आहे, असे स्पष्ट करत अवैध घुसखोरीप्रकरणी कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिला.