मुंबई : गृहनिर्माण प्रकल्प वेळेत पूर्ण न करणाऱ्या राज्यातील १०,७७३ प्रकल्पांना महारेराने कारणे दाखवा नोटिसा बजावल्या असून, १,९५० प्रकल्पांचे बॅंक खाते गोठवण्यात आले आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत लेखी उत्तराद्वारे दिली.
आमदार सरोज अहिरे आणि संजय केळकर यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना शिंदे म्हणाले की, विकासकांनी ३० दिवसांत प्रकल्प पूर्ण करण्याबाबत मुदतवाढीचा अर्ज किंवा भोगवटा प्रमाणपत्र महारेराकडे सादर करावे. अन्यथा, महारेरा संकेतस्थळावर प्रकल्पास तात्पूरती स्थगिती देणे, बॅंक खाती गोठवणे आणि प्रकल्पाशी संबंधित व्यवहारांवर निर्बंध आणणे अशा कारवाईसाठी नोटीस बजावण्यात आली आहे.
बॅंक खाते गोठवण्यात आलेल्या १,९५० प्रकल्पांपैकी १०६ विकासकांनी मुदतवाढ मिळवली किंवा भोगवटा प्रमाणपत्र सादर केल्याने त्यांच्यावरची कारवाई मागे घेण्यात आली. तसेच, ८,८२३ प्रकल्पांची छाननी प्रक्रिया सुरू आहे, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.