मुंबई – राज्यात अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येईल, अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आज विधानसभेत दिली. ड्रग्स सेवन करणाऱ्यांविरोधात १५,८७३ गुन्हे दाखल करण्यात आले असून, १४,२३० जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच, अंमली पदार्थ बाळगणे आणि वाहतूक करणाऱ्यांवर २,७३८ गुन्हे दाखल करून ३,६२७ आरोपींना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत राज्यभरात ४,२४० कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी चांदिवली मतदारसंघातील घाटकोपर आणि साकीनाका पोलीस ठाणे हद्दीतील बेकायदेशीर गुटखा, गांजा, चरस विक्री तसेच ऑनलाईन लॉटरी व्यवसायाबाबत विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली. या परिसरात महिलांना फिरणे मुश्कील होत आहे आणि पोलिसांकडून गुन्हेगारांना पाठीशी घातले जाते, असा आरोप करत फईम खान नावाच्या गुंडाकडून लहान मुलांचा ड्रग्स विक्रीसाठी गैरवापर होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.
गृहराज्यमंत्री कदम यांनी उत्तर देताना सांगितले की, दहा कोटी रुपये किंमतीचा एमडी ड्रग्स साठा जप्त करून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. राज्यात अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांना पाठिशी घालणार नाही आणि ॲन्टी-नार्कोटिक टास्क फोर्सची स्थापना करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
हिरानंदानी वसाहतीतील शैक्षणिक संकुल परिसरात जर अंमली पदार्थ विक्री होत असेल, तर तातडीने कारवाई केली जाईल, असे आश्वासन देत अन्न व औषध प्रशासन विभागाच्या (FDA) संबंधित अन्न सुरक्षा अधिकारी पदे दोन महिन्यांत भरली जातील, असेही त्यांनी सांगितले.
विजय वडेट्टीवार आणि अस्लम शेख यांनीही यावेळी संबंधित मुद्द्यांवर प्रश्न विचारले.