X: @therajkaran
राष्ट्रवादीत बंड करून भाजपची हात मिळवणी केलेल्या अजित पवारांना (Ajit Pawar) धक्क्यावर धक्के बसत आहेत. कारण त्यांनी भाजपसोबत (BJP) जाण्याबाबत घेतलेल्या निर्णयाला पवार कुटुंबातील होणारा विरोध अधिकच वाढला आहे. कारण आधी अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवारांनी (Shrinivas Pawar) अजित दादांच्या भूमिकेला विरोध केला होता. त्यानंतर त्यांच्या पत्नी शर्मिला पवार (Sharmila Pawar) यांनी सुद्धा ‘आपल्याला फक्त साहेबांना विजयी करायचं’ आहे, असं म्हणत शरद पवारांसोबत उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनीही अजित पवारांची साथ सोडली आहे.
यापूर्वी अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांनी दादांच्या विरोध भूमिका घेतली, त्यानंतर आता श्रीनिवास पवार आणि त्यांच्या पत्नी शर्मिला पवार यांनी देखील अजित पवारांच्या भूमिकेला विरोध केला आहे. याबाबत बोलताना शर्मिला पवार म्हणाल्या की, वडीलधारी लोकांचा मान ठेवला पाहिजे. साहेबांनी आपल्यासाठी काय केलं हा प्रश्न विचारणे म्हणजे आई आणि वडिलांनी माझ्यासाठी काय केलं, असं विचारल्यासारखे आहे. शेवटी कुटुंब वडीलधारी लोकांपासून सुरू होते. साहेबांनी इतक्या वर्षात मात खाल्ली आहे का? आपण त्याला कारणीभूत होऊया का? आपण त्याला गालबोट लावायचं का? असा सवाल शर्मिला पवार यांनी उपस्थित केला. तसेच, कुणाला यश मिळते हा मुद्दाच नाही, पण आपल्याला फक्त साहेबांना विजयी करायचं आहे, असेही पवार म्हणाल्या.
दरम्यान, अजित पवारांच्या भाजप सोबत जाण्याच्या निर्णयाने पवार कुटुंबियातील दरी अधिकच वाढत चालली आहे. येत्या निवडणुकीच्या काळात आपल्याला काही कठोर निर्णय घ्यावे लागतात. हा काळ संवेदनशील आणि दुःखदायक आहे. तुम्ही सर्वजण कुटुंबाचे भाग आहात. कुणाला विरोध करायचा नाही. कुटुंब म्हटले की भांड्याला भांड लागतं. पण आपल्या कुटुंबात असे कधी घडले नाही. आपण त्यावर मात करतो तसा प्रयत्न करत आहे. आपल्या सगळ्यांच्या घरी वडीलधारी आहेत. आपली ओळख शरद पवारांमुळे आहे. त्यांचे विरोधक देखील साहेबांचं नाव घेतात, असे पवार म्हणाल्यात.
यापूर्वी ज्यांना कुणाला काही पद मिळाली ती साहेबांमुळे मिळाले. साहेबांना म्हणायचे कीर्तन करा, घरी बसा हे काय मला पटलं नाही. मी वेगळा माणूस आहे. माझ्या शाळेतील मित्र मला न सांगता गेले (भरणेंना टोला), औषध विकत आणतो त्याला एक्सपायरी डेट असते. तशी नात्यांची देखील एक्सपायरी डेट असते. वाईट वाटून घ्यायचं नाही. मला दबून जगायचं नाही, जगायचं तर स्वाभिमानाने. जे लाभार्थी आहेत त्यांच्यामागे जायचं मला वाटत नाही, असे श्रीनिवास पवार म्हणाले होते.