महाराष्ट्र ताज्या बातम्या

पहिल्याच पावसात मिसिंग लिंकचा मोठेपणा निसर्गाने मातीमोल केला; भास्कर जाधवांचा घणाघात

भास्कर जाधव विधानसभेत मिसिंग लिंक, अतिवृष्टी आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या मुद्द्यावर बोलताना

मुंबई : जगातील अनेक देशांतील तज्ज्ञांचे साहाय्य आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उभारलेल्या मिसिंग लिंकचा मोठेपणा पहिल्याच पावसात निसर्गाने मातीमोल केला, असा घणाघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ सदस्य भास्कर जाधव यांनी गुरुवारी विधानसभेत केला.

राज्यात ५ आणि ६ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टी आणि ढगफुटीसदृश पावसामुळे वाहतूक ठप्प होणे, महामार्ग बंद पडणे, वाहने अडकून पडणे, घरांची पडझड, नागरिक बेघर होणे आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर निर्माण झालेले प्रश्न या विषयांवर विरोधी पक्षांनी नियम १०१ अंतर्गत अल्पकालीन चर्चा उपस्थित केली होती. या चर्चेत सहभागी होताना जाधव यांनी मिसिंग लिंकवर दरड कोसळल्याचा मुद्दा उपस्थित केला.

“२४० किमी प्रतितास वेगाने वादळ आले तरी या प्रकल्पाला धक्का लागणार नाही, अशा घोषणा करण्यात आल्या होत्या. मग पहिल्याच पावसात काय झाले? दरड कोसळली तेव्हा वाऱ्याचा वेग केवळ ७० किमी प्रतितास होता. तरीही लोकांचे हाल झाले,” असे सांगत जाधव यांनी सरकारवर टीका केली.

कोकणातील पुरस्थितीचा मुद्दा उपस्थित करताना जाधव म्हणाले की, २०२१ साली महाड शहरात पुरामुळे हाहाकार माजला होता. खेड आणि चिपळूणही पाण्याखाली गेले होते. अशा परिस्थितीत नागरिकांना स्थलांतराच्या नोटिसा दिल्या जातात; पण त्यांनी जायचे कुठे, हा मूलभूत प्रश्न आहे, असे त्यांनी नमूद केले.

आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना सुरक्षित आश्रय मिळावा यासाठी पूरप्रवण क्षेत्रातील प्रत्येक गावात निवारा म्हणून स्वतंत्र इमारत असावी, अशी मागणी जाधव यांनी केली. पूरस्थिती टाळण्यासाठी पाणी खाडीत सोडण्याकरिता तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने दहा हजार कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्या तरतुदीचे काय झाले, असा सवालही त्यांनी सरकारला विचारला.

परशुराम घाटाच्या संदर्भातही जाधव यांनी गंभीर इशारा दिला. “परशुराम घाट कापू नका. वरची आणि खालची गावे धोक्यात येतील,” असे त्यांनी सांगितले.

मुंबईतील अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर बोलताना भास्कर जाधव म्हणाले, “पहिल्याच पावसाने दाखवून दिले की मुंबई ठाकरेंच्या हाती सुरक्षित होती.”

या चर्चेत विरोधकांनी अतिवृष्टी, ढगफुटीसदृश पाऊस, महामार्गांवरील अडथळे, नागरिकांचे हाल आणि आपत्ती व्यवस्थापनातील त्रुटींसाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात