मुंबई – आगामी काळात रायगड जिल्हा भाजपाचा शंभर टक्के बालेकिल्ला होईल, असा ठाम विश्वास भाजपाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आणि माजी मंत्री आमदार रविंद्र चव्हाण यांनी बुधवारी येथे व्यक्त केला.
त्याचे कारण म्हणजे शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस, दिवंगत आमदार मीनाक्षी पाटील यांचे बंधू, माजी आमदार पंडितशेठ ऊर्फ सुभाष पाटील यांनी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आस्वाद पाटील, माजी सभापती चित्रा पाटील, सवाई पाटील यांच्यासह भाजपात जाहीर प्रवेश केला.
भाजपच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमाला खासदार धैर्यशील माने, आमदार महेश बालदी, आमदार प्रशांत ठाकूर, प्रदेश सरचिटणीस आमदार विक्रांत पाटील, अविनाश कोळी, कमलाकर दळवी आणि माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन उपस्थित होते.
“मोदी-फडणवीसांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याने प्रवेश”
यावेळी बोलताना आमदार चव्हाण म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देश आणि राज्य वेगाने प्रगती करत आहेत. त्यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून पाटील यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला आहे. पंडितशेठ पाटील हे सामान्य जनतेसाठी लढणारे नेते असून, त्यांच्या प्रवेशामुळे पक्ष संघटन अधिक बळकट होईल. भाजप त्यांच्या योगदानाचा सन्मान राखेल.”
“रायगडात भाजप क्रमांक एक होईल”
पक्षप्रवेशानंतर बोलताना माजी आमदार सुभाष पाटील म्हणाले, “पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देश व राज्याचा सर्वांगीण विकास होणार असल्याची खात्री आहे. त्यामुळेच आम्ही भाजपात प्रवेश केला असून, रायगड जिल्ह्याचा विकास साधण्यासाठी भाजपाच्या साथीने जोमाने कार्य करणार आहोत.”
शेकापच्या अनेक नेत्यांचा भाजपात प्रवेश
या पक्षप्रवेशात दिवंगत आमदार मीनाक्षी पाटील यांचे पुत्र व रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, तसेच जिल्हा बँकेचे संचालक आस्वाद पाटील, जिल्हा परिषदेचे ६ माजी सभापती, ७ जि.प. सदस्य, जिल्हा बँकेचे २ संचालक आणि ६० आजी-माजी सरपंचांनी भाजपात प्रवेश केला.
भाजपात प्रवेश करणाऱ्यांमध्ये जनार्दन पाटील, सुगंधा पाटील, संजय पाटील, प्रियदर्शिनी पाटील, भावना पाटील, संदीप घरत, एकनाथ गायकवाड, वैभव चांदे, वसंत यादव, राजा सानप, स्मिता पाटील, महादेव दिवेकर आदींचा समावेश आहे.