मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शालेय अभ्यासक्रमात पहिलीपासून हिंदी सक्तीविषयी सरकारला जोरदार इशारा दिला आहे. “हिंदी ही राष्ट्रभाषा नाही, ती फक्त एक राज्यभाषा आहे. महाराष्ट्रात पहिलीपासून ती शिकण्याची सक्ती आम्ही खपवून घेणार नाही,” असे स्पष्ट मत राज ठाकरे यांनी मांडले.
ते पुढे म्हणाले की, “सरकारने त्रिभाषा सूत्र फक्त सरकारी व्यवहारांपुरते मर्यादित ठेवावे. शिक्षणात ते आणू नये. हे हिंदीकरण आम्ही होऊ देणार नाही. प्रत्येक राज्यात फक्त त्यांच्या राजभाषेचाच सन्मान राखला गेला पाहिजे. उद्या इतर राज्यांमध्ये मराठी पहिलीपासून शिकवणार आहात का?”
राज ठाकरे यांनी असा आरोपही केला की सरकार जाणूनबुजून मराठी विरुद्ध मराठीतर असा संघर्ष उभा करून राजकीय फायदा घेण्याच्या प्रयत्नात आहे. आर्थिक अडचणी, शेतकरी निराशा आणि बेरोजगारी झाकण्यासाठी सरकार “फोडा आणि राज्य करा” ही नीती राबवत आहे, असा टोला त्यांनी लगावला.
“आज भाषा लादत आहेत, उद्या आणखी काही लादतील,” असा इशारा देत त्यांनी सर्व मराठी जनतेला, पत्रकारांनाही आवाहन केले की कुठलाही वाद न करता या निर्णयाचा निषेध करावा. “सरकारने लोकभावनेचा आदर करून तात्काळ हा निर्णय मागे घ्यावा,” अशी मागणीही त्यांनी केली.