भाजपने छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या तुलनेत चांगली आघाडी मिळवत सत्तास्थापनेकडे वाटचाल सुरू केली आहे. अशा परिस्थितीत छत्तीसगडमधील काँग्रेसची बोट बुडण्याच्या कारणांची राजकीय वर्तुळात चर्चा केली जात आहे. काय आहेत ती कारणं, जाणून घेऊया.
- विधानसभेच्या ९० जागा असलेल्या छत्तीसगडमध्ये भाजप तब्बल ५४ जागांनी आघाडीवर आहे. विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात भाजपने कोळसा घोटाळा, दारू घोटाळा आणि महादेव बेटिंग अॅप प्रकरणात ईडीच्या छापेमारीचा हवाला देत काँग्रेस आणि राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप लावले होते. महादेव अॅपवरुन आरोप आहे की, काँग्रेस आणि मुख्यमंत्री बघेल यांनी बेटिंग अॅपच्या प्रमोटर्सकडून ५०८ कोटी घेतले होते.
- तांदूळ मिल घोटाळ्यात ईडीने आरोप केला होता की, मार्कफेडचे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि राज्य तांदूळ मिल असोसिएशनचे काही पदाधिकारी, जिल्हा मार्केटिंग अधिकारी आणि काही तांदूळ मिलच्या मालकांनी चुकीच्या पद्धतीने १७५ कोटी रुपये काढले. याशिवाय कथित मिनरल फंड घोटाळ्यात ईडीच्या तपासानुसार, अनेक मोठ्या पदावरील व्यक्तींनी छत्तीसगडमध्ये येणाऱ्या कोळशावर २५ रुपये प्रति टननुसार बेकायदेशीर वसुली केली.
- पीसीएस घोटाळा हा छत्तीसगड लोक सेवा आयोग २०२१ च्या परिणामांशी संबंधित आहे. लोक सेवा आयोगाच्या परीक्षांचा निकाल या वर्षी जूनमध्ये आला होता. भाजपने काँग्रेसवर या परीक्षेत गोंधळ केल्याचा आरोप केला होता. भाजपने आरोप केला की, निवड प्रक्रियेत पारदर्शकता पाळण्यात आली नाही. मात्र छत्तीसगड लोक सेवा आयोगाने या आरोपांचं खंडन केलं आहे.
- छत्तीसगडमधील काँग्रेस सरकार एकीकडे विकासाचा हवाला देत राहिली तर दुसरीकडे भाजपचं प्रचारतंत्र सत्तेतील काँग्रेस पक्षाच्या घोटाळ्या भोवती राहिलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी छत्तीसगडच्या बघेल सरकारविरोधात आरोपपत्र दाखल करीत त्यांच्यांवर घोटाळा आणि जनतेची लूट केल्याचा आरोप केला होता. छत्तीसगड हे गांधी कुटुंबांचं एटीएम झाल्याचा आरोप करीत येथे भ्रष्टाचाराचे सर्व रेकॉर्ड तोडल्याचा खरमरीत आरोप केला होता.
- राज्यातील सत्तेत सरकार असतानाही काँग्रेस मतदारांशी थेट संपर्क करू शकली नाही. याशिवाय काँग्रेसच्या नेतृत्वातही कमतरता असल्याचे दिसले. भूपेश बघेलांचं नेतृत्व परिणामकारक असलं तरी एका नेत्याच्या जोरावर निवडणूक जिंकणं अवघड असतं.
- काँग्रेस नेत्यांमध्ये रणनीतीची कमतरता पाहायला मिळाली. काँग्रेस अनेक भागात मतदारांचं मन ओळखू शकली नाही. अनेक नेते जास्त सक्रिय राहिले असते तर पक्षाला फायदा होऊ शकला असता मात्र, अंतर्गत संघर्षामुळे पक्षाला याचं नुकसान भोगावं लागलं.