मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (MHT-CET) मध्ये मोठा घोळ झाल्याची तक्रार काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. त्यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये यासाठी तातडीने चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दिनांक २७ एप्रिल २०२५ रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेत अहमदनगर जिल्ह्यातील काही केंद्रांवर गणिताच्या ५० गुणांच्या पेपरमध्ये सुमारे २० ते २५ प्रश्नांसाठी चुकीचे पर्याय देण्यात आल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. काही प्रश्नांमध्ये सर्वच पर्याय चुकीचे होते. मात्र विद्यार्थ्यांच्या तक्रारींकडे परीक्षा केंद्रांनी दुर्लक्ष केल्याचे सपकाळ यांनी पत्रात नमूद केले आहे.
फक्त अहमदनगर नव्हे, तर राज्यातील इतर भागांतही अशा तक्रारी येत असून काही ठिकाणी सर्व्हर डाऊन झाल्याने परीक्षेला व्यत्यय आल्याचेही समोर आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये प्रचंड नाराजी आणि अस्वस्थता पसरली आहे.
“अभियांत्रिकीसारख्या महत्त्वाच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश देणाऱ्या परीक्षेत प्रश्नपत्रिकेतील त्रुटी आणि तांत्रिक अडचणी विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात घालू शकतात. प्रश्न चुकीचे असतील तर त्या विद्यार्थ्यांना योग्य गुण देण्यात यावेत. तसेच या गडबडीस जबाबदार असलेल्या संस्थांवर कठोर कारवाई केली जावी. भविष्यात अशी अपयशी ठरणारी कंत्राटदार संस्था काळ्या यादीत टाकावी,” अशी स्पष्ट भूमिका सपकाळ यांनी मांडली आहे.
सरकारने या प्रकरणाकडे संवेदनशीलपणे लक्ष देऊन योग्य ती चौकशी करावी आणि कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची हमी द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.