मुंबई : “ऑपरेशन सिंदूरचाच एक भाग म्हणून भारताची दहशतवादविरोधी ‘झिरो टॉलरन्स’ भूमिका अधिक प्रभावीपणे आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यासाठी खासदारांची सात सर्वपक्षीय प्रतिनिधी मंडळे वेगवेगळ्या राष्ट्रांना पाठवण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मी आदरणीय पंतप्रधानांचे मनापासून अभिनंदन करतो. ही भारताच्या परराष्ट्र धोरणातील एक ऐतिहासिक पायरी ठरणार आहे,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
ते म्हणतात की, पहेलगामचा माणुसकीला काळीमा फासणारा दहशतवादी हल्ला आणि त्यानंतरच्या काळात भारताने पाकिस्तानचा जगासमोर आणलेला आतंकवादाचा चेहरा हा कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा मोठा विजय आहे असं मी समजतो. विशेष म्हणजे या शिष्टमंडळांमध्ये देशातल्या सर्व राजकीय पक्षांचा देखील समावेश केल्यामुळे दहशतवाद विरोधात देशाची एकजूट आहे हे चित्र दिसलं.
संपूर्ण जगासमोर दहशतवादाची गंभीर समस्या आहे. त्या विरोधात ठामपणे उभं राहण्यासाठी अशा रीतीने उचललेलं हे पाऊल जगभरात भारताची प्रतिमा एक जबाबदार, शांतताप्रिय आणि दहशतवाद विरोधात कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणारे राष्ट्र म्हणून उजळेल, असा मला विश्वास वाटतो असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात.