नवी दिल्ली: महाराष्ट्र सरकारने ‘विकसित भारत 2047’ या राष्ट्रीय संकल्पनेस अनुरूप स्वतःचे ‘व्हीजन 2047’ तीन टप्प्यांत तयार केले असून, त्यानुसार 100 दिवसांच्या सुशासन कार्यक्रमात 700 हून अधिक उद्दिष्टे साध्य करण्यात आली आहेत. आता दीडशे दिवसांचा विस्तृत कार्यक्रम राबविण्यात येत आहे. 2029 पर्यंतचे अल्पकालीन, 2035 पर्यंतचे मध्यमकालीन आणि 2047 पर्यंतचे दीर्घकालीन असे तीन स्तरांचे नियोजन महाराष्ट्राच्या अमृत महोत्सवाला दिशा देणारे ठरेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्लीत पार पडलेल्या निती आयोगाच्या बैठकीत स्पष्ट केले.
फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राची विद्यमान अर्थव्यवस्था 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर आणि 2047 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलर करण्याचा सरकारचा संकल्प आहे. त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय सैन्याचे ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत मन:पूर्वक आभार मानले आणि यामधून मोदी सरकारचा दहशतवादाविरोधातील झिरो टॉलरन्सचा संकल्प अधोरेखित होतो, असे नमूद केले.
नवीन औद्योगिक धोरणाबाबत फडणवीस यांनी सांगितले की, राज्याच्या जीएसडीपीमध्ये उत्पादन क्षेत्राचे योगदान 20 टक्क्यांवर नेणे हा प्रमुख हेतू आहे. ‘मैत्री 2.0’ या सिंगल विंडो प्रणालीच्या माध्यमातून ईव्ही, सेमिकंडक्टर, ग्रीन हायड्रोजन, डेटा सेंटर्स यांसारख्या क्षेत्रांना प्रोत्साहन देण्यात येत आहे.
फडणवीस म्हणाले की, 2024-25 च्या पहिल्या तिमाहीत महाराष्ट्राने देशात सर्वाधिक 1.39 लाख कोटींची परकीय गुंतवणूक आकर्षित केली आहे. दावोस येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये राज्याने 15.96 लाख कोटींचे सामंजस्य करार केले असून, त्यापैकी 50 टक्क्यांहून अधिक प्रस्तावांवर प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू झाली आहे. विशेष बाब म्हणजे ही गुंतवणूक मुख्यतः दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीतील शहरांमध्ये होत आहे.
पायाभूत सुविधांबाबत बोलताना फडणवीस यांनी स्पष्ट केले की, समृद्धी महामार्ग, अटल सेतू, कोस्टल रोड यांसारखे प्रकल्प विकासाला चालना देत आहेत. वाढवण पोर्ट, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो, रेल्वे, मल्टीमॉडेल लॉजिस्टिक पार्क प्रकल्पांमुळे क्षेत्रीय समतोल साधला जात आहे.
एमएमआर क्षेत्राला 2047 पर्यंत 1.5 ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेत रूपांतरित करण्याचा उद्देश असून, यासाठी केंद्र सरकारकडून विशेष आर्थिक सहाय्य मिळावे, अशी अपेक्षाही फडणवीस यांनी व्यक्त केली.
ते म्हणाले की, राज्य सरकार टीयर-2 आणि टीयर-3 शहरांमध्ये औद्योगिक विकासाला चालना देत असून, गडचिरोली स्टील सिटी, नागपूर संरक्षण हब, अमरावती टेक्सटाईल क्लस्टर, छत्रपती संभाजीनगर ईव्ही उत्पादन केंद्र, दिघी येथे स्मार्ट इंडस्ट्रियल सिटी हे प्रकल्प आकार घेत आहेत.
सेवा क्षेत्रालाही प्रोत्साहन देण्यासाठी आयटी, लॉजिस्टिक्स, निर्यात प्रोत्साहन, AVGC (ऑडियो-व्हिज्युअल-गेमिंग-कॉमिक्स), GCC धोरणे राबविण्यात येत असून, मुंबईत दोन वैश्विक स्टुडिओंसाठी 5000 कोटींचे करार झाले आहेत. युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क आणि युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया यांच्याशी शैक्षणिक सहकार्य प्रस्थापित झाले आहे.
फडणवीस म्हणाले की, स्टार्टअप आणि नवोन्मेषांना चालना देण्यासाठी ‘इनोव्हेशन सिटी’ उभारली जात आहे. ग्रामीण भागातील आयटीआयंमध्ये PPP माध्यमातून जागतिक दर्जाचे प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. एआय, हरित ऊर्जा, बायोटेक, फिनटेक, अॅग्रीटेक यांसारख्या क्षेत्रांमध्ये केंद्रित इकोसिस्टीम तयार केली जात आहे.
ऊर्जाक्षेत्रात राज्य सरकारने 45,500 मेगावॅट अतिरिक्त ऊर्जा खरेदी करार केले असून, यातील 36,000 मेगावॅट ही हरित ऊर्जा आहे. फडणवीस यांनी सांगितले की, 2030 पर्यंत 52 टक्के ऊर्जा ही हरित स्रोतांद्वारे निर्माण होईल. सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत 10 हजार कृषी फिडरवर 16,000 मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प सुरू असून, त्यातील 1,400 मेगावॅटचे प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. डिसेंबर 2026 पर्यंत 100 टक्के दिवसा शेतीला सौर ऊर्जेवर वीज दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
पंप स्टोरेज प्रकल्पांसाठी 62,125 मेगावॅट क्षमतेचे 45 पीएसपी प्रस्ताव असून, त्यासाठी 15 करार झाले आहेत. यामध्ये 3.42 लाख कोटींची गुंतवणूक व 96,190 रोजगार निर्माण होणार असल्याचे फडणवीस म्हणाले.
पर्यावरणपूरक विकासासाठी सर्क्युलर इकॉनॉमीला चालना दिली जात असून, ई-वेस्ट, प्लास्टिक, मेटल, वाहन यांसाठी विशेष रिसायकलिंग पार्क विकसित केले जात आहेत.
नाशिक कुंभमेळा 2027 साठी केंद्र सरकारकडून मार्गदर्शन आणि निधी मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानताना, त्यांनी हा सन्मान मराठी भाषिक जनतेच्या भावनांना दिलेले मान्यतेचे स्थान असल्याचे म्हटले.
“महाराष्ट्र संपूर्ण क्षमतेने विकसित भारत-2047 चे लक्ष्य गाठण्यासाठी केंद्र सरकार आणि सर्व राज्यांबरोबर ‘विकास आणि विरासत’ या व्हीजनसाठी तत्पर राहील,” असे ठाम प्रतिपादन फडणवीस यांनी आपल्या भाषणाच्या समाप्तीला केले.