मुंबई: – पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवर सातत्याने होणाऱ्या हिंसाचारामुळे हिंदू कुटुंबांना स्थलांतर करावे लागत आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुस्लिम मतांसाठी लाचार झाल्या असून त्यांनी हिंदू समाजाच्या सुरक्षेच्या बाबतीत पूर्ण अपयश पत्करले आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमधील सरकार बरखास्त करावे, अशी मागणी शिवसेनेचे खासदार व प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.
म्हस्के म्हणाले, “वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक केंद्र सरकारने मंजूर केल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवरील हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. मुर्शिदाबादमध्ये काही समाजकंटकांनी पोलिसांसमोरच हिंदू कुटुंबांवर हल्ला करत त्यांची हत्या केली. वाहनांची जाळपोळ झाली असून अनेक कुटुंबे घरदार सोडून पळून जात आहेत. ममता बॅनर्जी या मुख्यमंत्रीपदास पात्र नाहीत.”
‘उबाठा गप्प का?’ – खडा सवाल
“बंगालमधील हिंदूंवरील अत्याचारांबाबत उबाठा गप्प का आहे?” असा थेट सवालही खा. म्हस्के यांनी उपस्थित केला. शिवसेनेचे शिष्टमंडळ लवकरच पश्चिम बंगालला भेट देऊन पीडित हिंदू कुटुंबांना मदत करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
’ममता बॅनर्जी म्हणजे तहव्वूर राणा’
मुस्लिम तुष्टीकरणाच्या राजकारणासाठी ममता बॅनर्जी लाचार झाल्याचा आरोप करत म्हस्के म्हणाले, “२६/११ चा सूत्रधार तहव्वूर राणाप्रमाणे ममता वागत आहेत. त्यांच्या वागणुकीवरून त्यांचे नाव आता ‘ममता राणा’ ठेवावे, अशी खरमरीत टीका त्यांनी केली.”
‘उद्धव ठाकरे गप्प का?’
“स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणारे आणि ममतांना चहापानाला बोलावणारे उद्धव ठाकरे आता बंगालमधील हिंदूंवरील अत्याचाराचा निषेध करतील का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला. त्यांनी पुढे नमूद केले की, २०१८ मध्ये रामनवमीच्या दिवशी राणीगंजमध्ये दंगल घडवण्यात आली होती, त्यावेळेसही ममता सरकारने घटनांची मोडतोड केली होती.
‘खचलेला पक्ष, खचलेला नेता’
“शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे हेच बाळासाहेबांच्या विचारांना पुढे नेत आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जनतेने खरी शिवसेना कोणती हे स्पष्ट केले आहे,” असे म्हस्के म्हणाले. “आता AI तंत्रज्ञानाच्या मदतीने बाळासाहेबांची भाषणे चालवावी लागतात, ही त्यांच्या पक्षाची दुर्दशा आहे. त्यांची अवस्था आता ‘खचलेले मन, खचलेला पक्ष, खचलेली वृत्ती आणि खचलेला नेता’ अशी झाली आहे,” अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली.
‘संजय राऊत हे जळकं लाकूड’
“संजय राऊत हे जळकं लाकूड आहेत, त्यातून अधूनमधून धूर येतो,” अशा शब्दांत म्हस्के यांनी टीका करत भाषणाचा समारोप केला.