महाड – लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत झालेल्या पराभवानंतर जबाबदार नेत्यांवर कारवाई होत नसल्याने महाड विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. पराभवाच्या जखमेवर फक्त उपदेशाचे डोस पाजण्याऐवजी, पक्षाने मतदारसंघात आर्थिक बळ देणारा नेता पाठवावा, अन्यथा आम्ही आमच्या ताकदीवर लढण्यास सक्षम आहोत, असा इशारा स्थानिक शिवसैनिकांनी (उबाठा) पक्षाच्या मुंबईतील नेत्यांना दिला आहे.
कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत शिवसेनेच्या सततच्या पराभवामुळे शिवसैनिक खचले आहेत. मात्र, त्यांच्या उभारणीसाठी आर्थिक मदतीऐवजी केवळ शब्दांच्या फुशारक्या दिल्या जात असल्याने शिवसैनिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
महाड मतदारसंघात माजी आमदार कै. माणिकराव जगताप यांच्या कन्या स्नेहल माणिकराव जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या काळात काँग्रेस सोडून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षात प्रवेश केला होता. मात्र, त्या २२ हजार मतांनी पराभूत झाल्यानंतर पक्ष सोडून भाजपाकडे वळण्याचा विचार केला. भाजपाच्या दुर्लक्षामुळे अखेर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यात पुन्हा प्रवेश केला.
त्यामुळे महाड मतदारसंघ नेतृत्वशून्य झाल्याची भावना स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये आहे. पक्षाच्या मुंबईतील नेत्यांनी निष्ठावान शिवसैनिकांना आधार देण्याऐवजी केवळ पोकळ आश्वासने देत असल्याचा आरोप स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
“आम्ही फक्त नेत्यांसाठी पायघड्या टाकून सतरंज्या उचलायच्या का?” असा सवाल शिवसैनिकांनी बैठकीत उपस्थित केला. त्यामुळे मुंबईतील नेत्यांना आता सरळ संदेश मिळाला आहे – मुंठी आवळणाऱ्या नेत्यांऐवजी आर्थिक ताकद देणाऱ्या नेत्याला पाठवा, अन्यथा आम्ही विरोधकांशी आमच्या बळावर लढण्यास तयार आहोत.
यामुळे कोकणातील शिवसैनिकांमध्ये असलेला रोष आगामी काळात मुंबईच्या शिवसेना नेत्यांसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.