मुंबई – “७५ वर्षांनंतर निवृत्तीचा कोणताही नियम नाही, तसेच संजय राऊत यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे आणि त्यांना भाजप द्वेषाची कावीळ झाली आहे,” अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली.
संजय राऊत यांनी केलेल्या विधानावर प्रत्युत्तर देताना बावनकुळे यांनी एक्सवर (Twitter) पोस्ट करत राऊतांना लक्ष्य केले. ते म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ७५ वर्षांनंतर निवृत्त व्हावे, असा कोणताही नियम नाही, ना भाजपच्या अधिकृत धोरणात असे काही आहे. भारतीय संविधानातही यासंदर्भात कोणताही ठराव नाही.”
बावनकुळे यांनी ऐतिहासिक संदर्भ देत सांगितले की, “अटलबिहारी वाजपेयी ७९ व्या वर्षांपर्यंत पंतप्रधान होते, मोरारजी देसाई ८३ व्या वर्षी, तर डॉ. मनमोहन सिंग ८१ व्या वर्षांपर्यंत पंतप्रधानपदावर होते. त्यामुळे संजय राऊत यांचे विधान म्हणजे केवळ राजकीय स्टंटबाजी आहे.”
ते पुढे म्हणाले, “भारतीय लोकशाहीत पंतप्रधानांनी कधी निवृत्त व्हायचं, हे संजय राऊत किंवा विरोधक ठरवत नाहीत, तर लोकशाही ठरवते. मोदीजींच्या नेतृत्वाखाली २०४७ पर्यंत विकसित भारताचा संकल्प पूर्ण होईल.”
बावनकुळे यांनी संजय राऊत यांना “सकाळचा भोंगा” असे संबोधत त्यांच्यावर जोरदार टीका केली आणि भाजपच्या विरोधातील त्यांची मानसिकता आता हास्यास्पद झाल्याचे सांगितले. “मोदींना कधी निवृत्त व्हायचे हे जनता ठरवेल, संजय राऊत नाही,” असे ठाम प्रतिपादन त्यांनी केले.