मुंबई : “भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशात धार्मिक मालमत्तांमध्ये सरकारने हस्तक्षेप करण्याची गरज काय? वक्फच्या जमिनी म्हणजे दानधर्मातून दिलेल्या जमिनी असून, त्यावर कोणाचाही अधिकार असू शकत नाही. सरकारने या जमिनींवर तिरक्या नजरेने पाहू नये,” असा थेट इशारा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिला.
“वक्फच्या जमिनी सामाजिक कार्यासाठी वापरण्याच्या दृष्टीने कायदे करायला हवेत, पण त्यांचा हस्तक्षेप करून गैरवापर होता कामा नये,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, “मुंबईतील अंबानी यांचे घर कोणत्या जमिनीवर आहे, याचा शोध घेतला जातो का? मात्र, मुस्लिम समाजाच्या वक्फ जमिनींवर सरकारचे लक्ष आहे.
“होय, मुस्लिम समाजातील काही नेत्यांनी वक्फचा गैरवापर केला असेल. पण म्हणूनच कायद्याचा बळजबरीने वापर करून संपूर्ण वक्फ बोर्डावर हस्तक्षेप करण्याचा सरकारला अधिकार मिळतो का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
“भारताच्या दक्षिण भागातील मंदिरांमध्ये इतकं सोनं आहे की, ते देशाला श्रीमंत करू शकतं. मग वक्फच्या जमिनींवर इतका आक्षेप का?” “एकदा एखादी जमीन वक्फ केली गेली, म्हणजेच समाजासाठी दान करण्यात आली, तर ती हस्तांतरित करता येत नाही. सरकारने जर नवीन कायदा करायचा असेल, तर तो असा असावा की, ही संपत्ती कुणाच्याही अन्याय्य हस्तक्षेपातून वाचेल,” असेही त्यांनी नमूद केले.
“दिल्लीच्या मध्यवर्ती भागातील काही वक्फ जमिनी मोकळ्या बाजारात आणल्या जात आहेत. संसद देखील वक्फच्या जमिनीवर आहे. मग उद्या वक्फ बोर्ड संसद भवनावरही दावा करेल का?” असा टोला त्यांनी सरकारला लगावला.
ते पुढे म्हणाले, “संसद ही ब्रिटिशकालीन वास्तू आहे. ती बांधली जात असताना वक्फ बोर्डाचा काही संबंध होता का? त्यामुळे किरण रिजीजू यांचे विधान चुकीचे असून, सरकारचा जबाबदार मंत्री सभागृहात ऑन-रिकॉर्ड अशा चुकीच्या गोष्टी बोलतो आणि त्या जगभर प्रसारित होतात. मग हे कसं योग्य?”
“जनता आणि पोलीस यांच्यात सुसंवाद असावा, म्हणून महाराष्ट्रातील पोलीस स्थानकांमध्ये दरवर्षी इफ्तार पार्टी आयोजित केली जात असे. यंदा त्यासाठी निमंत्रण पत्रिका छापल्या गेल्या, पण ऐनवेळी सरकारने आदेश दिला की, हा कार्यक्रम रद्द करा! मग नेमकं सरकारला काय साध्य करायचंय?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
“हिंदू मंदिरांमध्ये अब्जो रुपयांचे सोने आहे. सरकार ते ताब्यात घेणार का? हे सरकार स्पष्ट करणार का?” असा थेट सवालही त्यांनी केला.
“राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट विचारांनी वेगळे आहेत. आमचे आदर्श शरद पवार साहेब आहेत, आणि आम्ही गांधी-नेहरूंच्या विचारांचे अनुयायी आहोत. त्यामुळे जातीयवादी शक्तींबरोबर जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कोणीही संभ्रम निर्माण करू नये,” असे आव्हाड यांनी स्पष्ट केले.