मुंबई – सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोमवारी मुंबईत पत्रकार परिषद घेत बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या छळाचा आणि कथित जमीन हडप प्रकरणाचा मोठा खुलासा केला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे सहकारी राजेंद्र घनवट यांच्यावर गंभीर आरोप केले.
दमानिया यांनी धनंजय मुंडे आणि राजेंद्र घनवट यांच्यातील कथित आर्थिक संबंध उघड करत, शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. पत्रकार परिषदेत त्यांनी असा दावा केला की, बीडमधील अनेक शेतकरी, विशेषतः महिला, घनवट यांच्या छळाला सतत बळी पडत आहेत.
“घनवट यांनी धमक्या देऊन शेतकऱ्यांच्या जमिनी स्वस्तात खरेदी केल्या. शेतात काम करणाऱ्या महिलांना शिवीगाळ केली. एवढेच नव्हे, तर नऊ शेतकऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले,” असा आरोप दमानिया यांनी केला.
पत्रकार परिषदेत उपस्थित असलेल्या पीडित शेतकरी दांपत्य मीरा आणि राजेंद्र सोनवणे यांनी आपली व्यथा मांडताना सांगितले की, “२००८ पासून आम्ही न्यायासाठी झगडत आहोत, पण कुठेही न्याय मिळत नाही. धनंजय मुंडे यांनी पोलिसांना फोन करून आमच्यापैकी आठ जणांवर गुन्हे दाखल करण्यास सांगितले.”
मीरा सोनवणे यांनी भावनिक आवाहन करत सांगितले की, “पोट भरण्यासाठी मला घुंगरू बांधून नाचावे लागते. आमच्याकडे जमीन असतानाही अशी वेळ का यावी?”
राजेंद्र सोनवणे यांनी सांगितले की, “पोपट घनवट यांच्या धमकीनंतर माझ्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर घनवट यांच्या माणसांनी येऊन सांगितले की, आमच्या वडिलांनीच जमीन विकली आहे.”
दमानिया यांची राज्य सरकारकडे मागणी
दमानिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना शेतकऱ्यांना मदत करण्याचे आणि त्यांच्या जमिनी परत मिळवून देण्याचे आवाहन केले.
“राजेंद्र घनवट आणि पोपट घनवट यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्या आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे,” असे त्या म्हणाल्या. तसेच, वाल्मिक कराड, धनंजय मुंडे आणि राजेंद्र घनवट यांच्यातील आर्थिक संबंधांची चौकशी करण्याची गरज आहे, असा दावा त्यांनी केला.
या प्रकरणावर धनंजय मुंडे आणि घनवट यांची प्रतिक्रिया येणे बाकी आहे. मात्र, या प्रकरणामुळे बीडमधील शेतकऱ्यांच्या छळाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. आता राज्य सरकार या प्रकरणात काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.