नांदेड : ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून भारताने जगाला आपली ताकद दाखवली आहे. भारताच्या दिशेने वाकड्या नजरेने पाहण्याचा प्रयत्न जरी झाला, तरी आम्ही असा धडा शिकवू की सात पिढ्या लक्षात ठेवतील, असा सज्जड इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नांदेडमध्ये जाहीर सभेतून दिला.
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमानिमित्त आयोजित या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री पंकजा मुंडे, खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार संजय केनेकर व संजय कौडगे आदी उपस्थित होते.
पाकिस्तानने भारतात केलेल्या दहशतवादी हल्ल्यांना भारताने सडेतोड प्रत्युत्तर दिले असून, ‘ऑपरेशन सिंदूर’ ही मोहीम त्याचे सर्वोत्तम उदाहरण आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राबवलेल्या कारवाईने पाकिस्तानातील अतिरेकी तळ उद्ध्वस्त करण्यात आले, असे शहा यांनी स्पष्ट केले.
देशातील नक्षलवाद पूर्णपणे समूळ नष्ट करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असून, 31 मार्च 2026 पर्यंत देशातून नक्षलवादाचे उच्चाटन करण्यात येईल, अशी ग्वाहीही अमित शहा यांनी दिली.

बाळासाहेब ठाकरे असते तर मोदींना गळाभेट दिली असती
“आज बाळासाहेब ठाकरे जिवंत असते तर ऑपरेशन सिंदूरनंतर त्यांनी पंतप्रधान मोदींची गळाभेट घेतली असती. मात्र उद्धव ठाकरे यांच्याकडे ना भावनात्मक जाणीव आहे ना राष्ट्रीयतेची तळमळ. त्यामुळे अशा ऐतिहासिक क्षणाची जाणीवही त्यांना झाली नाही,” अशा शब्दांत अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
’मेक इन इंडिया’मधून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त – फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे अभिनंदन करताना म्हटले की, 2014 नंतर ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत तयार केलेल्या स्वदेशी शस्त्रास्त्रांद्वारे पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. ही भारतासाठी ऐतिहासिक उपलब्धी ठरली आहे.