मुंबई : दक्षिण मुंबईतील मंत्रालय ते वरळी परिसरात मध्यरात्रीनंतर पहाटेपर्यंत अनधिकृत वाहनतळ सुरू ठेवून पार्किंगसाठी भरमसाठ पैसे आकारले जात आहेत. मात्र, ही वसुली महापालिका तिजोरीत जमा न होता खाजगी व्यक्तींकडे जात असल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आमदार सुनील प्रभू यांनी आज विधानसभेत केला.
प्रभू यांनी माहितीच्या मुद्यावर प्रश्न उपस्थित करताना मलबार हिल, ट्रायडेंट हॉटेल, मंत्रालय परिसरात पहाटे दोन वाजेपर्यंत अवैध पार्किंगसाठी जादा शुल्क घेतले जात असल्याचे निदर्शनास आणले. स्टेट्स हॉटेल, क्रॉफर्ड मार्केट, वरळी नाका आणि हायवेवरील ब्रिजखालीही असे अनधिकृत वाहनतळ चालवले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
या पार्किंग घोटाळ्यामध्ये महापालिकेच्या संबंधित वॉर्ड अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याचा आरोप करत प्रभू म्हणाले की, दुचाकी वाहनांसाठी २०० रुपये आणि चारचाकींसाठी २५० रुपये आकारले जात आहेत. यासाठी कोणतीही अधिकृत परवानगी नसून बोगस पावत्या छापून लूट सुरू असल्याचे त्यांनी म्हटले. हा कोट्यवधींचा घोटाळा असून, तातडीने दखल घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.