महाराष्ट्र ताज्या बातम्या

“त्यावेळी जे बोललो ते योग्यच होते” – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जुन्या व्हिडिओवर स्पष्टीकरण

मुंबई – राज्यातील राजकारण तापले असताना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. मात्र, आता याच व्हिडिओवर स्पष्टीकरण देताना अजित पवार म्हणाले, “त्या काळच्या परिस्थितीनुसार मी विरोधी पक्षात असताना जे बोललो ते योग्यच होते. मात्र, आता आम्ही एकत्र आहोत, त्यामुळे तसे बोलणे उचित ठरणार नाही.”

नुकतेच व्यंगचित्रकार कुणाल कामरा याने शिवसेना फुटीवर आधारित एक व्यंगात्मक गाणे सादर केले, ज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना “गद्दार” म्हटले गेले. हे गाणे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले, मात्र त्यानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली. कामराचे जिथे जिथे कार्यक्रम झाले, तिथे शिवसेना (शिंदे गट) समर्थकांनी तीव्र निषेध नोंदवत आंदोलन केले आणि काही ठिकाणी तोडफोडही केली.

या पार्श्वभूमीवर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर अजित पवार यांचा एक जुना व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये, पवार यांनी विरोधी पक्षनेते म्हणून एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यांनी शिंदे गटावरील आरोप करत “शेंबड्या पोरालाही कळतंय, ५० खोके एकदम ओके!” असे म्हणत शिंदेंना “गद्दार” संबोधले होते.

खासदार राऊत यांनी या व्हिडिओच्या आधारे दावा केला की, कुणाल कामराच्या गाण्याची प्रेरणा याच विधानांमधून मिळाली आहे.

या वादावर शुक्रवारी विधिमंडळ परिसरात प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले, “मी विरोधी पक्षात असताना त्या काळच्या परिस्थितीत जे बोललो ते योग्यच होते. मात्र, आता आम्ही एकत्र निवडणुकीला सामोरे गेलो आणि सत्तेतही आहोत. त्यामुळे आता तसे बोलणे योग्य ठरणार नाही.”

अजित पवार यांच्या या स्पष्टीकरणानंतर वाद काहीसा शांत झाल्याचे दिसत असले, तरी सोशल मीडियावर अजूनही हा व्हिडिओ आणि कुणाल कामराच्या गाण्याची जोरदार चर्चा सुरूच आहे.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात