पुणे : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत भारतीय हवाई दलानं मध्यरात्री दीडच्या सुमारास पीओकेमधल्या नऊ ठिकाणी एअर स्ट्राईक केली. या कारवाईत कोणताही पाकिस्तानी नागरिक किंवा लष्कराचं ठिकाण लक्ष्य केलं नाही. फक्त दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त करण्यात आले. या कारवाईबद्दल शरद पवारांनी भारतीय जवानांचं मनापासून अभिनंदन केलं आहे.
शरद पवार म्हणाले, भारतीय सैन्यावर देशवासियांचा पूर्ण विश्वास आहे. काश्मीरमध्ये जे काही घडलं, त्यामुळे देशात नाराजी होती. पण सरकारनं घाई न करता विचार करून निर्णय घेतला. हवाई दलानं पीओकेमधले दहशतवादी तळ लक्ष्य करत चोख प्रत्युत्तर दिलं.
ते पुढं म्हणाले, पाकिस्तानमधून लोक येतात आणि निर्दोष नागरिकांवर गोळ्या झाडतात. पीओकेमध्ये दहशतवाद्यांचे कॅम्प आहेत, तिथे दारुगोळा जमा केला जातो आणि पाकिस्तानकडून त्यांना मदत केली जाते. आपल्याला पाकिस्तानची सीमा ओलांडायची नव्हती आणि हवाई दलानं ती खबरदारी घेतली.
या हल्ल्यानंतर अमेरिका, जपानसारख्या देशांनी भारताला पाठिंबा दिला, पण चीननं नाही. पवार म्हणाले, शेवटी आपल्याच देशाचं संरक्षण आपल्यालाच करावं लागणार आहे. देशासाठी सतर्क राहणं गरजेचं आहे.
अखेर शरद पवार म्हणाले, सर्वपक्षीय बैठकीत सगळ्यांचा आग्रह होता की या मुद्द्यावर राजकारण न करता सरकारच्या पाठीशी उभं राहावं. आता संपूर्ण देश आणि राजकीय नेतृत्वाची जबाबदारी आहे की, आपल्या जवानांच्या पाठीशी ठामपणे उभं राहावं.