नवी दिल्ली : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्यदलांनी पाकिस्तान आणि POKमधील दहशतवादी ठिकाणांवर सुरू केलेल्या “ऑपरेशन सिंदूर”चं भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (CPI) स्वागत केलं आहे.
CPIच्या राष्ट्रीय कार्यालयातून जाहीर करण्यात आलेल्या वक्तव्यात पक्षानं म्हटलंय की, या भीषण हल्ल्यात २५ भारतीय आणि एक नेपाळी नागरिक ठार झाले होते. अशा वेळी दहशतवाद्यांच्या मूळ केंद्रांवर थेट कारवाई करणं भारतासाठी आवश्यक होतं. भारतीय हवाई दलानं केवळ दहशतवाद्यांचे केंद्र लक्ष्य केलं आणि पाकिस्तानी लष्कराला दूर ठेवून जबाबदारीनं पावलं उचललं – ही बाब कौतुकास्पद आहे, असं पक्षानं म्हटलंय.
CPIनं सरकारला आवाहन केलं आहे की, अशा गंभीर प्रकरणात सर्वपक्षीय बैठक बोलावून एकसंघ भूमिका घ्यावी. तसेच प्रदेशात दीर्घकालीन शांतता राखण्यासाठी राजनैतिक आणि चर्चेच्या मार्गांनी पुढे जावं.
पक्षानं पाकिस्तानलाही इशारा दिलाय की, ज्याला स्वतःला दहशतवाद्यांचं संकट भोगावं लागतं, त्या पाकिस्ताननं आपल्या भूमीवरून चालणाऱ्या दहशतवादी जाळ्यांचं निर्मूलन करावं.
CPIनं शेवटी असं म्हटलंय की, भारताच्या न्याय, धर्मनिरपेक्षता आणि एकतेच्या मूल्यांवर पक्षाचा ठाम विश्वास आहे आणि सगळ्या भारतीय जनतेची एकजूट हीच भारताची खरी ताकद आहे.