महाराष्ट्र ताज्या बातम्या

अपघातमुक्त सेवा देणाऱ्या एसटी चालकांचा रोख पारितोषिक देऊन सन्मान

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

मुंबई: दरवर्षी अपघातमुक्त सेवा बजावणाऱ्या एसटी चालकांचा रोख रक्कम देऊन गौरव केला जाणार असल्याची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली. बुधवारी झालेल्या एसटी महामंडळाच्या ३०७ व्या संचालक मंडळाच्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली.

या बैठकीस एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, कामगार आयुक्त तथा संचालक ह. पि. तुम्मोड, रेल्वे बोर्डाचे मुख्य वाणिज्य प्रबंधक व संचालक डॉ. सुमंत देऊलकर आणि एसटीचे विविध खातेप्रमुख उपस्थित होते.

सरनाईक म्हणाले, वर्षभरात २६० दिवस अपघातविरहित सेवा बजावणाऱ्या चालकांचा सत्कार स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन आणि महाराष्ट्र दिनी रोख रकमेच्या पुरस्काराने केला जाईल. तसेच सलग ५, १०, १५ आणि २० वर्षे अपघातमुक्त सेवा देणाऱ्या चालकांचाही अशाच पद्धतीने गौरव केला जाईल.

ते म्हणाले की, एसटी महामंडळ गेली ७७ वर्षे राज्यातील सामान्य नागरिकांना किफायतशीर व सुरक्षित प्रवास सुविधा देत आहे. अपघातांचे प्रमाण अत्यल्प असून, एसटीवर प्रवाशांचा विश्वास वाढीस लागलेला आहे. अशा अपघातमुक्त चालकांचा सन्मान केल्यास, ते अधिक सजगतेने सेवा देतील, असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला.

राज्यातील २०४ बसस्थानकांवर एटीएम सुविधा

प्रवाशांच्या सोयीसाठी राज्यातील २०४ बसस्थानकांवर लवकरच एटीएम केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. यासाठीची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, राष्ट्रीयकृत बँका आणि इतर बँकांची एटीएम यंत्रे बसस्थानकांवर उपलब्ध होतील, असेही सरनाईक यांनी सांगितले.

नव्या बसेसची खरेदी – ३ बाय २ आसनरचना कायम

नव्या ३ हजार बसेस खरेदीस संचालक मंडळाची मंजुरी मिळाली असून, यामध्ये पारंपरिक ३ बाय २ आसनरचना राहणार आहे. नव्या बसेसमध्ये सध्याच्या तुलनेत १५–१७ प्रवासी जास्त बसू शकतील, असे सरनाईक यांनी सांगितले.

१०० मिडी बसेस दुर्गम भागात धावणार

महामंडळ १०० मिडी बसेस खरेदी करणार असून, त्या मुख्यतः डोंगराळ आणि दुर्गम भागात चालवल्या जातील. या माध्यमातून आदिवासी पाड्यांपर्यंतही एसटी सेवा पोहोचणार आहे. दुर्गम भागांमध्येही एसटीची सेवा सुरू राहील, यासाठी महामंडळ कटिबद्ध आहे, असं सरनाईक यांनी स्पष्ट केलं.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात