मुंबई : कोकणातील रेवस-रेडी सागरी महामार्गाचे रुंदीकरण आणि काँक्रिटीकरण सध्या सुरू असून, प्रलंबित पुलांसाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. महामार्गाचे काम पूर्ण होण्यासाठी आणखी तीन वर्षे लागतील. या मार्गाद्वारे कोकणातील ८९ धार्मिक स्थळे जोडली जाणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तर तासात दिली.
महामार्गाचे काम दोन टप्प्यांत पूर्ण होणार
भाजप सदस्य निरंजन डावखरे यांनी ‘रेवस-रेडी सागरी महामार्ग पूर्ण व्हायला आणखी किती वेळ लागणार?’ असा तारांकित प्रश्न विचारला होता. उत्तर देताना मंत्री भुसे म्हणाले की, हा महामार्ग दोन टप्प्यांमध्ये पूर्ण होईल. या महामार्गावर एकूण नऊ पूल असून, त्यापैकी पाच पूल बांधण्यासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत, तर दोन पुलांचे काम सुरू आहे.
दाभोळ आणि काळबादेवी पुलांच्या कामात तांत्रिक अडचणी
दाभोळ आणि काळबादेवी येथील पुलांच्या कामांमध्ये काही तांत्रिक अडचणी असून, त्या सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. राज्य सरकार या महामार्गाचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही मंत्री भुसे यांनी स्पष्ट केले.