मुंबई : महाराष्ट्रातील भारतीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारित असलेल्या ५६ गड-दुर्गांचे संरक्षण आणि संवर्धन अधिक प्रभावीपणे करण्यासाठी त्यांचे हस्तांतरण राज्य पुरातत्व विभागाकडे करावे, अशी विनंती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांना पत्राद्वारे केली आहे.
गड-दुर्ग संवर्धनासाठी राज्य सरकारची मागणी
राज्यात सध्या राज्य पुरातत्व विभागाकडे ६२ गड-दुर्ग असून, त्यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेले गड-दुर्ग राज्य सरकारकडे दिल्यास त्यांच्या दुरुस्ती आणि संवर्धनाची जबाबदारी अधिक प्रभावीपणे पार पाडता येईल, असे शेलार यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
संवर्धनासाठी तज्ज्ञ आणि निधी उपलब्ध
महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभागाकडे वारसा संवर्धनातील विशेष तज्ञ आणि वास्तुविशारद असून, त्यांच्या माध्यमातून हे कार्य अधिक चांगल्या पद्धतीने पार पाडता येईल. यासोबतच, पर्यटनाला चालना देण्यासाठी खासगी संस्थांकडून ‘सीएसआर’ निधीही उपलब्ध होऊ शकतो.
गड-दुर्गांचे संरक्षण आमचे कर्तव्य
“हे गड-दुर्ग आपल्या इतिहासाची साक्ष देतात. त्यांचे जतन करणे ही आमची जबाबदारी आणि अभिमानाचे कार्य आहे. त्यामुळे केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारित असलेले गड-दुर्ग राज्य पुरातत्व विभागाकडे हस्तांतरित करावेत,” अशी मागणी शेलार यांनी पत्रात केली आहे.