मुंबई : “कोणतीही घटना घडली, आणि ती कोणीही घडवली, तरी काही लोक त्याला थेट आपला सगा-सोयराच समजतात. पण आपला सगा-सोयरा जर अपराधी ठरला, तरी त्याला शिक्षा करण्यात आम्ही मागेपुढे पाहणार नाही. कारण आमचा खरा सगा म्हणजे भारताचे संविधान आणि सोयरे म्हणजे महाराष्ट्राची १३ कोटी जनता आहे,” असा ठाम संदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेतील अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेच्या उत्तरादरम्यान दिला.
गुन्हेगारी नियंत्रणात; शिक्षा होण्याचा दर वाढला
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, लोकसंख्येच्या प्रमाणात महाराष्ट्र गुन्हेगारीच्या आकडेवारीत देशात आठव्या क्रमांकावर आहे. राज्यातील प्रमुख शहरे कायदा-सुव्यवस्थेच्या बाबतीत चांगल्या स्थितीत आहेत. २००९ ते २०१४ या कालावधीत महाराष्ट्रात गुन्ह्याला शिक्षा होण्याचा दर फक्त ९% होता, म्हणजे १०० अपराध्यांपैकी फक्त ९ जणांना शिक्षा होत होती. मात्र, २०१४ नंतर सुधारणा केल्यानंतर हा दर ५०% वर पोहोचला आहे.
अक्षय शिंदेला फाशी झाली असती, तरीही छाती बडवली असती का?
राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांनी चर्चेदरम्यान राज्यातील लोकशाहीबाबत चिंता व्यक्त केली. त्यावर प्रत्युत्तर देताना फडणवीस म्हणाले, “काल लोकशाही कोसळली असे ते म्हणत होते, पण ते महाराष्ट्राबद्दल म्हणत होते की बांगलादेशाबद्दल, हेच कळले नाही. दंगे करणारे आणि बलात्कार करणाऱ्यांसाठी इतका पुळका का? अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाला नसता, तर कायद्याने त्याला फाशी झाली असती. तरीही काही लोक त्याला स्वातंत्र्य सेनानी असल्यासारखी वागणूक देतात.”
जयकुमार गोरे प्रकरणात सुप्रिया सुळे, रोहित पवारांवर गंभीर आरोप
मंत्री जयकुमार गोरे यांना अडकवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांनी कट रचल्याचा गंभीर आरोप मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला. “जयकुमार गोरे यांच्याविरोधातील व्हिडिओ आरोपींनी सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांना पाठवले होते. त्यानंतर त्यांच्यात अनेकदा फोनवर चर्चा झाली. हा संपूर्ण प्रकार ब्लॅकमेलिंगचा आहे. राजकीय विरोध असावा, पण कुणाला राजकीय जीवनातून उठवण्याचा प्रयत्न चुकीचा आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात कठोर कारवाईचा इशारा
परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाच्या चौकशीसाठी न्यायमूर्ती आचलीया समिती स्थापन करण्यात आली आहे. “या अहवालात पोलिसांच्या मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यास दोषी पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला जाईल,” असे मुख्यमंत्री म्हणाले. याप्रकरणी पोलिस निरीक्षकासह चार पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.
नक्षलवाद निर्मूलनासाठी ठोस पावले
मुख्यमंत्र्यांनी नक्षलवादाच्या विरोधातील कारवाईबाबतही भाष्य केले. “गेल्या चार वर्षांत नक्षलविरोधी कारवाईत केवळ एक पोलीस शहीद झाला आहे. २०२४ मध्ये २८ नक्षलवादी मारले गेले, तर १९ जणांनी आत्मसमर्पण केले. मार्च २०२६ पर्यंत नक्षलवाद्यांचे संपूर्ण कंबरडे मोडायचे आहे, आणि महाराष्ट्र यात आघाडीवर आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
राज्यकारभार हातात हात घालून चालवतो, पायात पाय घालत नाही
विरोधकांकडून सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरू असले, तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. “आम्ही तिघे (सत्ताधारी पक्ष) पायात पाय घालणारे नाही, तर हातात हात घालून राज्यकारभार चालवणारे आहोत. कितीही काड्या घातल्या किंवा बांबू लागवड केली, तरी काही होणार नाही,” असा जोरदार इशारा त्यांनी दिला.